Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेत वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू असल्याचा आरोप करीत ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी (ता. १ जुलै) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते महापालिकेच्या गेट क्रमांक दोन असा पार पडला. पालिकेच्या गेट क्रमांक दोनवर माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. तसेच मोर्चावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. (Latest Political News)
एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केला. कोविड काळात केलेला घोटाळा लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या ठाकरे गटाकडून सुरू असल्याचा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिवसेना ठाकरे गटाचा आज मोर्चा काढला. आमचाही मोर्चा होता. मात्र बुलढाण्यातील आपघातामुळे हा मोर्चा रद्द केला. आम्ही संवेदनशील आहोत. त्यांना राजकारण करायचे आहे. ते त्यांना करु द्या. मात्र त्यांचा मोर्चाचा मार्ग चुकला. हा मोर्चा मातोश्री १ ते मातोश्री २ असा हवा होता. कारण कोविड काळात सर्व काही याच दरम्यान घडले आहे. त्यामुळे याच परिसरात मोर्चा काढायला हवा होता. हा मोर्चा म्हणजे 'चोरांच्या उलट्या बोंबा!'" यावेळी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, "कोविड काळात कोविड सेंटर माणसांना जगवण्यासाठी होते की मारण्यासाठी हेच कळत नव्हते. बोगस कोविड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लँट. डेडबॉडीची ६५० रुपयांची बॅग साडेसहाहजार रुपयांना विकत घेतील. आता ते ठाण्याची चौकशी करा म्हणतात. बिनधास्त करा! ठाण्यात ३२५ रुपयांना डेडबॉडीची बॅग मिळाली. आमचे सगळे उघड व्यवहार आहेत. महापालिकेच्या पैशांशिवाय आम्ही १२०० लोकांसाठी कोविड सेंटर उभे केले. तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. आता त्यांच्या मागे ईडी लागली की मोर्चा काढला.आता सिमेंटचे रस्ते सुरू करणे सरु केले ते काय चुकीचे आहे. हे २० वर्षांपूर्वीच करायला हवे होते. त्यामुळे साडेतीन हजार कोटी वाचले असते."
मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेच्या ठेवींवरही भाष्य केले. ते म्हणाले, "मुंबईत सुरू असलेल्या कामांमुळे काही लोकांच्या पोटात दुखतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही सुरू केला आहे. महापालिकेच्या ठेवी या कुणाच्या मालकीच्या नाहीत. हे जनतेचे पैसे आहेत. ते त्यांच्यासाठीचे खर्च केला जात आहे. आमचे सरकार आले त्यावेळी ७७ हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता तो आकडा ८८ हजार झाला आहे. पैसे खर्च करूनही हजार कोटी वाढले आहेत. मग यापूर्वी पैसे कुठे जात होते. दरोडा टाकणारेच आता चोरीची भाषा करू लागले आहेत. मोर्चे काढून तुम्ही मुंबईकरांना फसवू शकत नाही. पुढील दोन वर्षांमध्ये मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. त्याची सुरुवात झाली आहेत. त्यांच्या उपचारांना आम्ही कामांनी उत्तर देणार आहोत."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.