Dilip Walse Patil-Uddhav Thackeray
Dilip Walse Patil-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे गूढ खुद्द गृहमंत्री वळसे पाटलांनीच उलगडले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाचा ११२ क्रमांकाच्या फोन सेवेचा उद्या (ता. २ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज (ता. १ एप्रिल) मुख्यमंत्री ठाकरे यांची सकाळी भेट घेतली. संध्याकाळी सहा वाजता पुन्हा भेटणार आहे. माझ्यावरील नाराजीबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खुलासा केला आहे. एकमेकांना विश्वासात घेऊनच आम्ही सर्व निर्णय घेत असतो, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. (Meeting with Chief Minister was for administrative work : Home Minister Dilip Walse Patil)

गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राज्यभरात चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज, केंद्राच्या माध्यमातून भाजपकडून होणाऱ्या कारवायांना गृहमंत्र्यांकडून उत्तर दिले जात नाही. राष्ट्रवादीची भाजपबाबतची भूमिका नरमाईची आहे, अशी चर्चा रंगली होती. त्याला गृहमंत्री वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले.

वळसे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शासकीय आणि गृहविभागाच्या कामासाठी मी नेहमी भेटतो. आजही तशीच भेट होती. मुख्यमंत्र्यांसोबत आमची सुनियोजित बैठक होती. पोलिस दलाचा ११२ प्रकल्पाचा उद्या शुभारंभ होत आहे. त्यासंबंधात बैठक होती. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या भावना बरोबर आहेत. आमच्या विभागाकडून कमतरता होत असेल तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे, त्यावर गृहमंत्र्यांनी ‘सुधीर मुनगंटीवार काय बोलले, हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या वक्तव्यावर मी काय उत्तर देणार.’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री वळसे पाटील प्रभाव पाडू शकले नाहीत. पण माणूस म्हणून रॉयल आहे, असे म्हटले होते. त्यावर वळसे पाटील यांनी सांगितले की, प्रत्येकाची आपली भावना असते. आपल्या भावनांप्रमाणे तो विचार करत असतो, त्याप्रमाणे तो विचार मांडतो. तसाच विचार चंद्रकांत पाटील यांनी मांडला असावा.

मुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्रीपदही उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घ्यावे, अशी मागणी औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे, त्यावर ‘याबाबत तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा,’ असे उत्तर वळसे पाटील यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT