दिलीप पाटील
Ganesh Naik News : वनमंत्री गणेश नाईक हे आपल्या रोखठोक निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देखील त्यांच्याकडे आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील डाकिवली व कोनसई येथील नागरिकांनी पालकमंत्र्याच्या जनता दरबारात प्रदूषणासंदर्भात तक्रार केली असता त्यावर थेट प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकण्याचे आदेश त्यांनीप्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले.
वाडा तालुक्यात 74 टायर कंपन्यांनी आपले जाळे पसरवले आहे. बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे. यातील 54 टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत असतात. त्यांच्या त्रासाने येथील नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागल्याने ग्रामस्थ कासावीस झाले आहेत.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर सोमवारी (दि.9)ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रारी दाखल केल्या त्याची दखल घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कंपन्यांची पहाणी करून त्या बंद करण्याचे आदेश गणेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले.
वाडा तालुक्यात साधारणपणे 74 टायर कंपन्या सुरू असून या कंपन्यांमध्ये जुने टायर जाणून त्यापासून ऑइल, तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.मात्र या प्रक्रियेत मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या कारखान्यातील सांडपाणी हे येथील नाल्यात सोडले जात असल्याने मासे व जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत.शिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा बघितली जात नसल्याने या कंपन्यांमध्ये बॉयलरच्या स्फोटात वारंवार कामगार मृत्युमुखी पडत आहेत.
तालुक्यातील उसर,दिनकर पाडा,वडवली, बिलोशी,पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोने, कोनसई,डाकिवली या गावांच्या हद्दीत टायर कंपन्या बसलेल्या आहेत.या कंपन्यांमध्ये सुरक्षेची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, फॅक्टरी लायसन्स कंपन्यांकडे नाहीत, वनविभागाची परवानगी ही नाही, नगर रचना विभागाकडून बांधकामाची सनद ही घेतलेली नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत दाखल्यावरच हे कारखाने उभे आहेत.
वाड्यातील डाकिवली व कोनसई येथील नागरिकांनी पालकमंत्र्याच्या जनता दरबारात प्रदूषणासंदर्भात तक्रार केली असता त्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला गणेश नाईक यांनी दिले आहेत.यापूर्वीही जनता दरबारात इतर गावच्या नागरिकांनी तक्रारी केल्या असता त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारखाने बंद करण्याचे आदेश दिले त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 54 कारखान्यांना बंदची नोटीस पाठवली आहे तरीसुध्दा कारखानदार रात्रीच्या वेळेस व सुट्टीच्या दिवशी कारखाने चालवत असल्याचे दिसून येत आहे.
प्रदुषणामुळे हैराण असलेले तक्रारदार उमेश पाटील यांनी सांगितले की, डाकिवली गावातील अनंत दृष्टी प्रोसेससिंग एल एल पी टायर पायरोलोसिस कंपनीला बंदची नोटीस असतानाही ही कंपनी रात्री सुरू असते.प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या कंपनीच्या प्रदूषणामुळे माझ्या कुटूंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे.पालकमंत्र्याकडे काल जनता दरबारात तक्रार केली असून त्यांनी कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्यास मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.