Mantralay
Mantralay Sarkarnama
मुंबई

Mantralay News : मंत्रालयातील मंत्री, अधिकारी थंडगार; कर्मचारी, जनता घामेघूम !

महेश जगताप

Mumbai News : राज्यात विविध ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार हे सरकार सर्वसामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकऱ्यांचे असल्याचा दावा करतात. दुसरीकडे मंत्रालयातच वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत केवळ मंत्र्यांच्या कार्यालयासमोरील पंखे आणि वातानुकुलित यंत्रणा सुरू ठेवण्याचे तोंडी आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. (Mumbai Mantralaya)

या फतव्यामुळे मुंबईच्या ३७ अंश सेल्सियस तापमानाताही सचिव, प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, सहसचिव आणि अन्य अधिकाऱ्यांचे शिपाई आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यासाठी बसविलेले पंखे विजेचे बिल वाढवत आहेत, त्यामुळे ते बंद करावेत असे सामान्य प्रशासनाच्या वतीने सांगितल्याची माहिती काही अधिकाऱ्यानी दिली. परिणामी मंत्रालयातच सध्या मंत्र्यांचे कर्मचारी गारेगार आणि सामान्य जनता, चतुर्थश्रेणी कर्मचारी घामेघूम अशी अवस्था झाली आहे.

मंत्रालयाची (Mantralay) मुख्य इमारत पूर्णपणे वातानुकुलित आहे. सध्या मंत्रिमंडळात १९ मंत्री आहेत. त्यांनी आपली दालने सुशोभित करून घेतली. त्यानुसार सध्या दालनासमोरील रिकाम्या जागेतही वातानुकुलित यंत्रणा आहे. यामुळे मंत्र्यांचे शिपाई, सुरक्षा रक्षक, कार्यकर्त्यांना भर उन्हाळ्यात दिलासा मिळतो. विस्तारित इमारतीच्या आकशवाणीकडील दालनांमध्ये बहुतांश मंत्र्यांची दालने आहेत.

तिसऱ्या मजल्यावरील सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांचे आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचे दालन आहे. भुमरे यांच्या दालनासमोरील पंखे वेगाने फिरताना दिसतात. तर इतर ठिकाणचे पंखे बंद असतात.

पाचव्या मजल्यावर असलेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या कार्यालयासमोरील पंखे सुरू असतात. तर त्याच मजल्यावर असलेल्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे सहसचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दालनांसमोरील पंखे बंद असतात.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या दालनासमोरील पंख्यांसह वातानुकुलित यंत्रणा सुरू असते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. मात्र तेथील पंखे आणि एसी सुरू असतात. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे दालनात खूप कमी वेळा येतात. तरीही त्यांच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसाठी सतत पंखे सुरू ठेवले आहेत. त्याचवेळी अधिकाऱ्यांचे शिपाई, कामानिमित्त आलेले नागरिक यांना मात्र घाम पुसतच काम करावे लागत असल्याचे चित्र मंत्रालयात सध्या दिसत आहे.

मुंबईत (Mumbai) सध्या ३४ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्याबरोबरच आर्द्रतेमुळे घामाच्या धारा निघतात. परिणामी अनेकदा डी-हायड्रेशनचा त्रास होतो. मुंबईसारख्या शहरात पंख्याशिवाय राहण्याची कल्पनाही कुणी करत नाही. असे असतानाही वातानुकुलित यंत्रांपेक्षा पंख्यांमुळे जास्त वीज बिल येते, असा जावईशोध सामान्य प्रशासन विभागातील काही अधिकाऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे पंखे बंद करावेत, असे तोंडी आदेश दिले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT