Manse MLA Raju Patil
Manse MLA Raju Patil sarkarnama
मुंबई

मनसे आमदार राजू पाटलांनी दांडिया उत्सव आयोजकांना झापले ; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रासले असतानाच, अभिनेत्री अश्विनी कालसेकर यांनी देखील यावर उपरोधिक भाष्य केले. "या छानशा वाहतूक कोंडीत आम्ही बराच वेळ फसलो होतो," असे विधान कालसेकर यांनी केले. याच वक्तव्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. लोकांनी स्थानिक नेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी, "सगळी लोक येथे येऊन आपल्या शहराला नाव ठेवत आहेत, जनाची नाही तर मनाची तरी ठेवायला पाहीजे," असा टोला दांडिया आयोजकांना आणि सत्ताधारी गटाला लगावला आहे.

कल्याण डोंबिवलीत एका राजकीय पक्षाकडून डीएनसी मैदानावर दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवास गुरुवारी सिने अभिनेत्री अश्विनी कालसेकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे नागरिकांची माफी मागताना त्या म्हणाल्या, आपण सारेच कामकाजासाठी प्रवास करत असतो. वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडी होतो. अशाच या छानशा ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो होतो. वेळेत घरातून आम्ही निघालो, परंतू ट्रॅफिकमुळे वेळेत या ठिकाणी पोहोचू शकलो नाही अशी दिलगीरी त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

तसेच सुरुवातीलाच त्यांनी माझ्याकडून सर्व ठाणेकरांना नमस्कार असे शब्द काढले. यावर त्यांना मागून डोंबिवलीकरांना असे नाव सुचविले गेले. यावर त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट असल्याने रिटेक होऊ शकत नाही असे म्हणत डोंबिवलीकरांची माफी मागितली. यामुळे मुळात त्यांना आपण ठाण्यात आलो आहोत की डोंबिवलीत हेच माहित नव्हते का ? याची चर्चा रंगली आहे. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता निमंत्रित पाहुण्यांनीच हे सांगितले म्हणून बरे झाले, बाकी कोणी काही बोललं तर मग बॅनर लावावे लागतात. अशा शब्दांत समाज माध्यमांवर सत्ताधाऱ्याना ट्रोल केले जात आहे.

यावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जणाची नाही मनाची तरी ठेवायला पाहीजे. सगळी लोक येऊन आपल्या शहराला नाव ठेवत आहेत. आत्तापर्यंत मंत्री नितीन गडकरी, अनुराग ठाकुर येऊन गेले त्यांनी येथील वास्तव दाखविण्याचा प्रयत्न केला. आता हे कलाकार आपल्याला बोलतात. त्याआधी नाट्यगृहाच्या अवस्थेवरुन असे कलाकार आपल्याला बोलले आहेत. परंतू कुठे तरी मनाला असे वाटत असेल ना की आपली शहर चांगली व्हावी असा उपरोधिक टोला त्यांनी आयोजक आणि सत्ताधारी गटाला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, म्हणून मी नेहमी सांगत असतो की, शहरांचे नेतृत्व हे नेहमी स्थानिकांकडे असायला हवे. नवी मुंबईचे उदाहरण आहे आपल्याकडे, मी असेच बोलत नाही. तिथे गणेश नाईक साहेब भाजपाचे आहेत, परंतू त्यांना स्थानिक अस्मिता आहे, म्हणून केले त्यांनी तेथे काम. लोकांनी हा विचार यापुढे करायला हवा असा सल्ला देखील त्यांनी जनतेला यावरुन देऊ केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT