Maharashtra Politics Sarkarnama
मुंबई

Raju Patil: राज ठाकरे-मुख्यमंत्री शिंदे नेहमी का भेटतात ? राजू पाटलांनी सांगितलं 'हे' कारण

Mangesh Mahale

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बंद दाराआड भेटीनं चर्चांना उधाण आले आले. काल (गुरुवारी) शिंदे-ठाकरे हे भेटले. वर्षभरात त्यांची ही सहावी भेट होती. ही भेट म्हणजे राज्यातील नवी राजकीय समीकरणाची नांदी आहे का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना नेहमी का भेटत असतात, याचं उत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजू पाटलांनी टोला हाणला.

"एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सहा ते सात वेळा राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. एक दोन वेळेला मी सुद्धा सोबत होतो. सातत्याने राज्यातले वेगवेगळे विषय घेऊन राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. राज ठाकरेंनी केलेल्या काही सूचना मुख्यमंत्री मान्य करतात, त्यानुसार कामे होत असल्याने राज ठाकरे त्यांना भेटत असतात. यापूर्वी असे होत नव्हते. आमच्या सूचना विचारात घेतल्या जात नव्हत्या, म्हणून राज ठाकरे जात नव्हते. आता जे प्रश्न मांडले जातात त्यांना शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतात. यापूर्वी आमच्या सूचना कोणी विचारात घेत नव्हते, आता विकासाची काम होतात म्हणून राज ठाकरे शिंदेंना भेटतात, असे सांगत पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

शिंदे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा भेटल्याने राज्यात नव्या युतीचा जन्म होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला मुहूर्त साधत शिंदे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 22 जानेवरीला अयोध्येमधील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी मोदी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या निमंत्रणांवरून सध्या राजकारण पेटले आहे . याबाबत राजू पाटील म्हणाले, "कोणाला आमंत्रण दिले किंवा नाही दिले हे मला माहित नाही, परंतु प्रभू रामचंद्रांचा विषय हा सर्व हिंदूंच्या आस्थेचा आहे. यात कोणी राजकरण आणू नये किंवा त्याकडे तसे कोणी पाहू नये.आमंत्रण आले किंवा नाही आले तरी प्रभू रामांचे नाव घेऊन सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे,"

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करणार आहेत. यासाठी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. यासाठीचा मार्ग मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. या उपोषणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आमदार राजू पाटील यांनी जरांगेंना सल्ला दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्य सरकारने त्याचवेळी जरांगेंना स्पष्ट सांगायला पाहिजे होते. त्यांना तेव्हा समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे ही वेळ आली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मुंबईत त्यांचं स्वागतच आहे. मात्र आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याच भान ठेवून सर्वांनी आंदोलन करावं. आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे," असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT