Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंना आता मोदी सरकारकडून विशेष सुरक्षा? केंद्रीय पातळीवर हालचाली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी या दौऱ्याची तारीख आता जाहीर केली असून, ते 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. याचवेळी केंद्र सरकारच्या पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंना केंद्र सरकारकडून जादा सुरक्षा दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारची वाय प्लस सुरक्षा आहे. त्यांना आता मोदी सरकारकडून अधिकची सुरक्षा पुरवण्याच्या विचार सुरू आहे. राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा दिली जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारही राज ठाकरे यांना त्यांच्या आयोध्या दौऱ्यादरम्यान अधिक सुरक्षा देणार आहे. भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना केंद्र सरकार विशेष सुरक्षा देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज ठाकरे यांनी नुकतीच पुणे दौऱ्यात अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. अयोध्येला 5 जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोबत जाणार आहे. तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.

राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक होत सत्ताधारी शिवसेना व महाविकास आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दैाऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या या दैाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचे राऊतांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

त्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत मनसेच्या नेत्यांकडून सतत सांगितलेही जात होते. पण कोरोना व इतर कारणांमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबला होता. अखेर त्यांचा मुहूर्त ठरला आहे. अयोध्येत भव राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. तिथे जाऊन हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे राज ठाकरे यांनी ठरवल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT