NawabMalik and Mohit Kamboj
NawabMalik and Mohit Kamboj  Sarkarnama
मुंबई

मलिकांविरोधात भाजप आक्रमक; एकाच नेत्याकडून तीन खटले दाखल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiy) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर कंबोज आक्रमक झाले असून त्यांनी आता मलिकांविरोधात बुधवारी तिसरा खटला दाखल केला आहे. याआधी त्यांनी मलिकांविरोधात मानहानीचे दोन खटले दाखल केले आहेत. एका खटल्यात मलिकांना जामीनही मिळाला आहे.

क्रूझवरील पार्टीवर (Cruise Drugs Party) अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (NCB) केलेल्या कारवाईत मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्यानंतर ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. तसेच कंबोज यांच्यावर अपहरण, खंडणी, बँक घोटाळा असे अनेक आरोप मलिकांनी केले आहेत.

कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी मलिकांविरोधात दोन खटले दाखल केले आहेत. आता बुधवारी त्यांनी शिवडी येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालायात दावा दाखल केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधा तिसरा खटला दाखल केला आहे. माझ्यावर अपहरहणकर्ता, षडयंत्र करणारा, खंडणी आणि 1100 कोटींचा घोटाळा असे तथ्यहीन आरोप करणारे नवाब मलिक यांच्याविरोधात आज फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय माझी बदनामी केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेतील कलम 499-500 अंतर्गत खटला दाखल केल्याचे कंबोज यांनी म्हटलं आहे.

कंबोज यांनी यापूर्वीच मलिक यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मलिक यांनी कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केल्याप्रकरणी त्यांनी हा खटला दाखल केला आहे. या खटल्यात माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याचबरोबर त्यांना 5 हजार रुपयांची हमीही भरण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 डिसेंबरला होणार आहे.

मलिक यांनी कंबोज यांच्यावर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले? यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा, असे मलिक म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT