Raksha Khadse On Lok Sabha Sarkarnama
मुंबई

Raksha Khadse Lok Sabha Election : 'तर तो माझ्यावर अन्याय'; रक्षा खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण !

कैलास शिंदे

Raksha Khadse Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी ‘आपल्याला केवळ ‘खडसे’आडनाव असल्याने उमेदवारीसाठी डावलले जात असेल, तर तो आपल्यावर अन्याय आहे, असे वक्तव्य केले आहे. भाजपमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बदलाबाबत ज्या चर्चा सुरू होत्या. त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी आपले खुले मत व्यक्त केल्यामुळे भाजपच्या नेत्यापुढे विशेषत: भाजपचे संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन यांच्यापुढेच आता संकट निर्माण होणार असून, आगामी काळात उमेदवारीबाबत पेच निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिसऱ्यांदा भाजपकडून इच्छूक

भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना पक्षातर्फे उमेदवारी मिळाली, त्यावेळी त्या निवडून आल्या हाेत्या. त्यानंतर २०१९ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यावेळीही त्या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या आहेत. आता तिसऱ्यांदाही त्या भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, परंतु, या वेळी जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाने विधान परिषदेची आमदारकीही दिली आहे. एवढेच नाही, तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीकडून निकराने खिंड लढवित असून, थेट भाजपच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. यामुळेच लोकसभा मतदारसंघातील खासदार रक्षा खडसे यांच्या भारतीय जनता पक्षातील उमदेवारीवर चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत असल्यामुळे रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगितले जात असून, पक्ष त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याची तयारी करीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. रक्षा खडसे यांच्या ‘खडसे’ या नावावरून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरूनही उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर पक्षाचे राज्यातील नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांनाच उमेदवारी मिळेल, असे ठामपणे सांगितलेले नाही. पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, कदाचित उमेदवार बदलू शकतो, असेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

याबाबत सर्व चर्चाच सुरू होत्या. मात्र, खासदार रक्षा खडसे यांनी त्याला वाचा फोडली आहे, त्या म्हणाल्या, केवळ ‘खडसे’ नाव असल्यामुळे आपली उमेदवारी डावलण्यात येत असेल, तर तो आपल्यावर अन्याय असणार आहे. आपले सासरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले तरी तो त्यांचा निर्णय आहे. मी मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्य करीत आहे. पक्षाला तळागाळापर्यंत नेण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे केवळ ‘खडसे’ नावावरून आपल्याला उमेदवारी नाकारणे चुकीचे ठरणार आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्यावर सीबीआय, ईडी, तसेच अनेक चौकशीची कारवाई झाली. परंतु, रक्षा खडसे यांनी आपली कधीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु, पक्षाची शिस्त नेहमीच पाळली आहे. परंतु, पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत विचार केल्यास त्या एकदम राजकारणात आल्या अन् खासदार झाल्या, असे म्हणता येणार नाही. कोथळी येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथम त्यांनी भूषविले, त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या, जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापतिपद त्यांनी भूषविले.

पक्षाच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, त्यानंतर सन २०१४ मध्ये त्यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळाली, पहिल्या वेळेस त्यांच्या मागे सासरे एकनाथ खडसे यांची ताकद निश्‍चित होती, परंतु पाच वर्षांनंतर पुन्हा २०१९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पाच वर्षांत खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचेही बळ होते, त्याच बळावर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली अन् जनतेनेही त्यांना निवडून दिले हे नाकारता येणार नाही.

सासरे एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपच्या खासदार म्हणून रक्षा खडसे यांची परीक्षाच होती. परंतु, याच काळात त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, पक्ष म्हणून कुठेही त्यांनी विरोधी वक्तव्य केले नाही. पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या त्या सोबत राहिल्या, याच काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या बैठका घेतल्या. जनतेशी संपर्क कायम ठेवला, पक्षाच्या बैठकीत उपस्थितीही दिली. त्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांनी व्यासपीठावर सासरे एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. परंतु त्यावर मत व्यक्त केले नाही. उलट पक्ष म्हणून आपण भाजपसोबत खंबीर असे ठामपणे सांगितले. त्यामुळे कुटुंबातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा परिणाम त्यांनी कुठेही आपल्या पक्षीय राजकीय जीवनात होऊ दिला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षात तिसऱ्यांदा लोकसभा उमेदवारीचा दावा कायम ठेवला आहे. पक्षातील कार्य न पाहता केवळ ‘खडसे’नावामुळे डावलणे चुकीचे आहे हा त्यांचा दावा योग्यच असल्याचे दिसून येत आहे.

खासदार रक्षा खडसे यांनी आपले व्यक्त केलेले खुले मत भारतीय जनता रावेर लोकसभा मतदारसंघात पेच निर्माण करू शकते. ‘खडसे’ सून एवढीच ओळख न ठेवता रक्षा खडसे यांनी रावेर मतदारसंघात आपले स्वत:चे कार्य केले आहे. मतदारसंघाच्या वाडी -वस्तीपर्यंत जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या सोडविल्या आहेत. पक्षाच्या माध्यमातून स्वत:च्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात उमेदवार बदलण्याबाबत विचार केल्यास पक्षाला अडचण येऊ शकते.

तर रक्षा खडसे यांना सहानुभूती

रक्षा खडसे यांची उमेदवारी डावलल्यास पक्षाच्या नवीन उमेदवाराला तसेच पक्षाला या मतदारसंघात अधिक ताकद लावावी लागणार आहे. कारण रक्षा खडसे यांचे भाजपतील समर्थक नाराज होणारच आहेत, परंतु केवळ ‘खडसे’ नावावरून उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती रक्षा खडसे यांच्याकडे जाऊन पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, परंतु पक्षातर्फे त्याला समर्पक उत्तराचीही तयारी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपने उमेदवारी बदलल्या विरोधकावर तुटून पडण्यासोबत पक्षाच्या अंतर्गत नाराजी थोपविण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजप आणि पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन या मतदारसंघातील पेच कसा सोडविणार याकडेच लक्ष असणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT