Maharashtra Politics Morning oath Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Fadnavis: पवारांनी डबल गेम केला, असं म्हणणं सोडा.. तुमचा प्रयोग फसला ; राऊतांनी फडणवीसांना फटकारलं..

सरकारनामा ब्यूरों

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा पहाटेच्या (Morning oath) शपथविधीबाबत भाष्य केलं. या पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजून संपलेलं दिसत नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी या शपथविधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाल्याचा मोठा दावा त्यांनी केला.या शपथविधीबाबत पवारांच्या भूमिकेविषयी फडणवीसांनी विधान केलं आहे.यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

या शपथविधी कसा घेतला? यामागे कुणाची खेळी होती ? याबाबत फडणवीसांनी सविस्तरपणे सांगितले आहे. “शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिस्टरी’ समजून घ्यायला हवी, असे सांगत पवारांनी आमचा वापर करुन घेतला, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तो तुमचा प्रश्न ..

"डबल गेमची गोष्ट सोडा. महाविकास आघाडी एकत्र आली आणि सरकार बनलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी त्या सरकारला पूर्णपणे समर्थन दिलं हे सत्य आहे. त्यामुळे आता तुम्ही सकाळी कोणती शपथ घ्यायला सांगितली वगैरे तो तुमचा प्रश्न आहे. तुमचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे," असे राऊत म्हणाले.

ते झोपेत बडबडत असतील

राऊत म्हणाले, "फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. सध्याचं सरकार औटघटकेचं आहे. न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मुदत निम्मी संपली आहे. त्यामुळे 100 टक्के त्यांचे सरकार पडणार आहे. त्यामुळे कदाचित ते झोपेत किंवा जागेपणी बडबडत असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका,"

काय केलं आहे शरद पवारांनी ?

"फडणवीस म्हणतात की शरद पवारांनी अमुक केलं वगैरे. ठीक आहे...त्यात नवीन काय ? काय केलं आहे शरद पवारांनी ? आमच्याशी बोलत होते वगैरे सांगत आहेत. पण तुम्ही एक प्रयोग केला आणि तो फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना फटकारलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले..

पहाटेच्या शपथविधीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची शरद पवारांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल, असं ठरलं. सरकार कसं असेल याचा आराखडाही तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार हेही ठरलं आणि सर्व अधिकार आम्हाला दिले. आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT