<div class="paragraphs"><p>  Sanjay Raut&nbsp;</p></div>

Sanjay Raut 

 

sarkarnama

मुंबई

भाजपची अवस्था 'शरीर मांजराचे काळीज उंदराचे' अशीच

सरकारनामा ब्युरो

पुणे : ''१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल वर्षभर अभ्यास करीत बसले आहेत. तसे त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही केले. प्रत्येक वेळी बहुमताचा, लोकप्रिय सरकारचा अनादर करायचा, सरकारची कोंडी करायची व पायात पाय अडकवायचा हे घटनाविरोधी आहे,'' अशा शब्दात शिवसेनेनं (shivsena) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सुनावलं. 'सामना'च्या अग्रलेखात राज्यपालांवर टीका केली आहे.

''महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने करावी? ती डोकी मोजून करायची की, आवाजी मतदानाने करायची? हा विधानसभेचा अधिकार. सरकारने या प्रक्रियेबाबत राज्यपालांना कळवायचे असते व घटनेनुसार राज्यपालांनी ‘मम’ म्हणायचे असते,'' असे म्हणत शिवसेननं राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा असताना त्या बहुमताचा अनादर करायचा व सरकार बरखास्तीचे तुणतुणे वाजवायचे ही कसली तरहा?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

''भाजप पुढारी काय बोलतात, काय करतात याचे ताळतंत्र राहिलेले नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष हा वाघासारखा डरकाळ्या फोडीत होता व सिंहासारख्या गर्जना करीत होता. संयुक्त महाराष्ट्र लढय़ापासून वेळगावच्या लढय़ापर्यंत विरोधी पक्षाचे नेतेच महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज बनून लढे देत होते. महाराष्ट्राच्या पक्षाला एक महान परंपरा लाभली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणांना सभागृह सर्व गॅलऱ्या गच्च वाहत असत. पक्ष हा सरकारइतकेच महत्त्वाचे कार्य करीत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘मांजरचेष्टा करतो,'' असा टोमणा अग्रलेखात लगावला आहे.

विरोधी पक्ष मांजरीचा वंशज

''डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वत:चे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचे काळीज उंदराचे अशीच झाली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे ‘माकडचेष्टा’ म्हटले जाते. कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्याने तो जे काही उलटसुलट करीत आहे त्या ‘मांजरचेष्टा’च ठरत आहेत,'' अशी खोचक टीकाही केली आहे.

''महाराष्ट्राच्या भाजप पुढाऱ्यांनी या घटनाबाह्य कृतीचे समर्थन हे चांगल्या, निरोगी राजकीय प्रकृतीचे लक्षण नाही. मदांध हत्तीप्रमाणे लोक वागत आहेत, असे म्हणावे तर त्यांना गजराजाची उपमाही देता येत नाही, पण नक्कीच हे लोक मदांध झाले आहेत व सत्ता येत नाही, सरकार पडत नाही या तणावाने त्यांच्या डोक्याचा ‘केमिकल लोचा’ झाला आहे,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT