India terrorism news : भारत-पाकिस्तान युद्ध तणाव असतानाच, मुंबई 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वुर राणाबाबात राजधानी दिल्लीत एनआयएकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. तहव्वुर राणा याला सहा जूनपर्यंत तिहार तुरुंगात पाठवले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राणाला त्याच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपण्याच्या एक दिवस अगोदरच, विशेष न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्यासमोर हजर केले. तेथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. प्रत्यार्पणानंतर राणाला 11 एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले होते. त्याच दिवशी दिल्लीच्या न्यायालयाने राणाला 'एनआयए'च्या ताब्यात दिले.
मुंबई (Mumbai) हल्ल्याचा सूत्रधार अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याचा जवळचा सहकारी तहव्वुर राणा याला चार एप्रिलला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतात प्रत्यार्पणाविरुद्धची पुनर्विचार याचिका फेटाळली. त्यानंतर त्याला 11 एप्रिलला भारतात आणण्यात आले. त्याच दिवशी त्याला न्यायालयाने 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले होते. 28 एप्रिलला न्यायालयाने राणाच्या एनआयए कोठडीत आणखी 12 दिवसांची वाढ केली होती.
तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले होते की, राणा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद याच्या भारताविरोधातील (India) सध्याच्या आणि भविष्यातील दहशतवादी योजनांची माहिती देण्याची शक्यता आहे. एजन्सीने म्हटले आहे की, राणाच्या आरोग्याची काळजी घेत चौकशी केली जात आहे. दरम्यान, राणा याने दावा केला होता की, दररोज 20 तास चौकशी केली जात आहे.
चौकशीत राणा सहकार्य करत नसल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला. 30 एप्रिलला न्यायालयाने राणाच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली. यानंतर, तपास यंत्रणेने 3 मे रोजी न्यायालयात राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे नमुने घेतले. यासाठी राणा याला कडक सुरक्षेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैभव कुमार यांच्यासमोर आणण्यात आले. यानंतर, एनआयएने बंद खोलीत झालेल्या न्यायालयीन कामकाजात त्याच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले. राणाला अक्षरे आणि संख्या लिहिण्यास सांगितले होते.
26 नोव्हेंबर 2008 रोजी, मुंबईत 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एका रेल्वे स्टेशन, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला. हा हल्ला सुमारे 60 तास चालला. यामध्ये 166 लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडले होते. सुरक्षा दलांसोबत झालेल्या कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले. कसाबला पुढे मृत्यू दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.