Bhai Jagtap  Sarkarnama
मुंबई

Bhai Jagtap : भाई जगतापांची मिलिंद देवरांवर जहरी टीका; म्हणाले, 'काँग्रेसमधील घाण गेली...'

Jui Jadhav

Mumbai News : माजी खासदार मिलिंद देवरा यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचा 'हात' सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला. मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी देवरांवर जहरी टीका केली. 'मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडले, म्हणजे काँग्रेसमधील घाण बाहेर गेली,' अशा शब्दांत जगतापांनी निशाणा साधला.

दक्षिण मुंबईची जागा ही पूर्वीपासून काँग्रेसची आहे. ती या निवडणुकीतदेखील काँग्रेसला भेटायला हवी होती, अशी इच्छा मिलिंद देवरा यांची होती. मात्र, महाविकास आघाडीत या मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांचं नाव या जागेसाठी निश्चित केलं जाणार असल्याची चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीच्या आधीच ही जागा आपल्याला मिळावी, या विचाराने मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं. मिलिंद देवरा यांच्यासोबत मुंबई काँग्रेसमधील अनेक नगरसेवकदेखील शिवसेनेत गेले. या सर्व घडामोडींवर आता भाई जगताप यांनी भाष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मिलिंद देवरा यांनी आजपर्यंत पक्षासाठी नेमकं काय केलं ? जे काही आहे ते फक्त मुरली देवरा यांच्यामुळे आहे, त्यांच्या नावामुळे आहे,' असं म्हणत भाई जगतापांनी मिलिंद देवरांच्या राजकीय भविष्यावरच प्रश्न उपस्थित केला. तसेच मिलिंद देवरा काँग्रेसमधून बाहेर पडले, म्हणजे काँग्रेसमधील घाण बाहेर पडली,' अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

'दक्षिण मुंबई मतदारसंघ हा काँग्रेसचा होता मान्यच आहे. मात्र महाविकास आघाडीच्या काळात तिथे अरविंद सावंत हे 2 वेळा निवडून आले आहेत. त्यांनी तेथे कामं केली आहेत. त्यामुळे ते तेथून निवडून येत आहेत. या सगळ्यांचा विचार देवरांनी कधीच केला नाही. केवळ सत्तेच्या हव्यासासाठी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली,' असं मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं.

पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त

मिलिंद देवरा यांच्याबदल भाष्य करताना भाई जगताप यांनी काँग्रेस पक्षातील नेतृत्वावरदेखील प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस पक्षात एक ठाम नेतृत्व आता राहिलं नाही. मुंबई काँग्रेसमध्येदेखील एकीचे बळ दिसून येत नाही. जर ठोस नेतृत्व असतं तर आज इतके नगरसेवक पक्ष सोडून गेले नसते, असं सांगत भाई जगताप यांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. तिथेच दुसरीकडे काँग्रेस (Congress) जो राष्ट्रीय पक्ष आहे, त्याला मात्र आपले नेते पक्षात कसे टिकून राहतील, यावर विचार करणं आता गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जर पक्षाची ताकद दाखवायची असेल तर पक्षाला यावर विचार करावा लागेल, अन्यथा काँग्रेस पक्षासाठी पुढील काल हा अधिक संघर्षाचा होण्याची शक्यता आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

(Edited By Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT