Congress, BJP Sarkarnama
मुंबई

Congress Vs BJP : 'इंडिया'चा प्रभाव कमी करण्यासाठीच जालन्याचा प्रकार घडवला; काँग्रेसचा सरकारवर घणाघात

Nana Patole Attack On Narendra Modi : जनतेच्या घामाचा पैसा मित्रांच्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभले

उत्तम कुटे

Mumbai Political News : राज्यात काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु झालेली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. इंडियाच्या बैठकीचा प्रभाव कमी करण्यासाठी तर जालन्याचा प्रकार घडवला नसेल ना, अशी शंका उपस्थित करत लोकांच्या घामाचा पैशा पंतप्रधान मित्रांच्या खिशात घालत असल्याचा घणाघातही काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तीव्र शब्दात केलेल्या काँग्रेसच्या टीकेमुळे भाजपचे नेते आक्रमक होऊन राजकीय वातावरण तापणार आहे. (Latest Political News)

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. 'भाजप सरकारने मागील नऊ वर्षात जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ मूठभर उद्योगपती मित्रांसाठीच काम केले. सातत्याने खोटे बोलणारे पंतप्रधान देशाला प्रथमच लाभले, हे देशाचे दुर्दैव आहे', अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'यूपीए सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. पण मागील नऊ वर्षापासून केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ती प्रचंड वाढली, बेरोजगारीही वाढली, शेती, शेतकरी आणि संविधानिक संस्था संपवण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे', अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्त्वात नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रा सुरु झाली. उत्तर महाराष्ट्रातील साडेतीन हजार गावे तिच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. काँग्रेस व भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते, असे थोरात नगर येथे म्हणाले. "मराठा समाज हा राज्य सरकारकडे आरक्षणासाठी आशेने पहात होते. पण, ते काहीच हालचाल करत नसल्याने या समाजाची निराशा झाली. त्यातून आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली", अशी टीका थोरातांनी केली.

"मविआ सरकार असताना अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला. पण, मागील दीड वर्षात शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही", असा आऱोप त्यांनी केला. "इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा प्रभाव जाणवू लागल्याने जालन्यातील घटना घडवली काय, अशी शंका येते", असा आरोपही थोरांतीनी यावेळी केला. तर, 'वन नेशन, वन इलेक्शन'ही कल्पना व्यवहार्य आहे का हेसुद्धा तपासण्याची गरज आहे', असे थोरात म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT