sanjay raut | uddhav thackeray | nana patole sarkarnama
मुंबई

Nana Patole On Sanjay Raut: 'मविआ'त खटक्यावर खटके; आधी राऊत, आता पटोले; म्हणाले, 'ते कदाचित ठाकरेंपेक्षा मोठे नेते...'

Mahavikas Aaghadi Seat Sharing News : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या बैठकीत विदर्भातील काही जागांच्या वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खटके उडाले.त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील, तर बैठक होणार नाही,अशी भूमिकाच जाहीर करुन टाकली.

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीनंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे. महायुतीसमोर तगडं आव्हान उभं करण्यासोबतच जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आघाडीतील पक्षांंनी कंबर कसली आहे. एकीकडे महाविकास आघाडी भक्कम ठेवून निवडणुकांना सामोरे जाण्यासोबतच जागावाटपाचा समतोल साधायचा अशी तारेवरची कसरत सध्या उद्धव ठाकरे,नाना पटोले,शरद पवार यांची सुरू आहे.

अशातच महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत पोहचले, उद्धव ठाकरेंनीही तुटेल इतके कोणी ताणू नये असा इशारा दिला. पण आता या वादानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना डिवचलं आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता.18) माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी संजय राऊतांसोबत झालेल्या वादाच्या चर्चांवरही भाष्य केलं. ते म्हणाले,संजय राऊत (Sanjay Raut) हे कदाचित उद्धव ठाकरेसाहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावे लागत नसेल.पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे.आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत.आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते असंही पटोले यांनी यावेळी सांगितले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांनाही सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते.कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल,तर तो त्यांचा प्रश्न आहे असा खोचक टोलाही काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संजय राऊतांसह शिवसेना ठाकरे गटाला लगावला.

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या बैठकीत विदर्भातील काही जागांच्या वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खटके उडाले.त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, ठाकरे गटाने नाना पटोले असतील, तर बैठक होणार नाही,अशी भूमिकाच जाहीर करुन टाकली.

या वादाच्या चर्चेवर नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून कुणीही अशी भूमिका मांडलेली नसताना माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या प्रसारित होत आहेत.आमच्या महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे.पण भाजपात मारामाऱ्या सुरू आहेत.त्याच्या बातम्या का केल्या जात नाहीत? असा उलटासवालही त्यांनी केला.

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वादावर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र निवडणूक लढवत असतात, तेव्हा जागावाटपावरून थोडीशी खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही, हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवायला हवे.पण मोठा तंटाबखेडा झाला,असे वाटत नसल्याचंही ठाकरेंनी यावेळी सांगितलं होतं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT