Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

राजीनामा आझादांचा अन् महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुसफुस

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole : मुंबई : काँग्रेस (Congress) नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या काँग्रेस त्यागानंतर पक्षातील दुही अधिकच स्पष्टपणे समोर येऊ लागली आहे. देशात आज गंभीर परिस्थिती आहे. सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहे. संविधान धोक्यात आहे. अशावेळी भाजपला प्रश्न विचारण्याऐवजी काँग्रेस नेते पक्षालाच बदनाम करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. काँग्रेसचे जी २३ नेते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर कटकारस्थाने रचत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी पटोले यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसच्या प्रशिक्षण आणि प्रबोधन समितीच्या वतीने नवी मुंबईत शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पटोले यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन पत्र पाठविणाऱ्या जी २३ नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.

पटोले म्हणाले, काँग्रेसने नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मानसन्मान दिला. मात्र, एखादे पद मिळाले नाही म्हणून स्वार्थापोटी काही नेते पक्ष सोडत आहेत. गांधी परिवाराने या नेत्यांना सर्व महत्त्वाची पदे दिली. आज त्याच गांधी परिवाराविरोधात ते चुकीची वक्तव्ये करत आहेत. मी खासदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याचे वीज, पाणी जोडणी कापली होती. मात्र, गुलाम नबी आजाद हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना दिल्लीत त्यांचा सरकारी बंगला आणि सोयी सुविधा अजूनही कायम आहे.

ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर काँग्रेसला बदनाम करत आहेत. देशात आज गंभीर परिस्थिती आहे. सीमेवर चीनच्या कारवाया वाढलेल्या आहेत. संविधान धोक्यात आहे. अशावेळी भाजपला प्रश्न विचारण्याऐवजी हे नेते काँग्रेस पक्षालाच बदनाम करण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल पटोले यांनी केला.

भाजप सरकार देशभरात रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याचा डंका पिटत आहे. मात्र, त्यासाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दर महिन्याला ४४ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. जनतेवर एवढा मोठा कर्जाचा बोजा टाकून विकास कसला करता? मुंबई-गोवा महामार्ग १२ वर्षांपासून रखडलेला आहे. खड्डे बुजविण्याचे आदेश दिले तरी ते बुजविले जात नाही. या खड्ड्याने अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. कारण भाजप सरकारमधील लोकच या रस्त्यांचे ठेकेदार आहे, त्यांना फक्त मलिदा खायचा आहे, असेही पटोले म्हणाले.

देशात आज अनेक गंभीर समस्या आहेत महागाई, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. संविधान उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राहिलेल्या नाही आणि केंद्रातील सरकार या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, लोकांपर्यंत वास्तव पोहचावे यासाठी काँग्रेस पक्षाने शिबिरांचे आयोजन केले. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करणे ही या प्रशिक्षणामागची संकल्पना आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्नही आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT