Mumbai, 04 May : माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावरून माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी स्वपक्षासह महायुतीला खडे बोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे सर्व चांगले आहेत. तरीही माथाडी कामगारांना न्याय का मिळत नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आम्ही आणखी चार दिवस वाट बघू, त्यानंतर आम्ही थेट रस्त्यावर उतरू, असा इशाराही माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला आहे. नरेंद्र पाटील यांच्या या इशाऱ्याने महायुती सरकारला घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री हे (स्व.) अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला येतात. पण माथाडी कामगारांचे (Mathadi Kamgar) प्रश्न काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. माथाडींना न्याय का मिळत नाही? असा सवाल कामगारांना पडलेला आहे.
माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक तीन आणि सुरक्षा रक्षक अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक चारमध्ये माथाडी, सुरक्षा रक्षकांचे हक्क कायम राखण्यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात याव्यात. याशिवाय इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागणीवर महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, तसेच माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीतर्फे आंदोलने करण्यात आली आहेत. प्रत्येक वेळी सत्तेवर असणाऱ्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, हे प्रश्न अद्याप कायम आहेत.
माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक तीन राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधानभवनात 11 मार्चला या विधेयकाचे सादरीकरण करण्यात आले आहे. विधान परिषदेत त्यावर चर्चा झाली. त्या चर्चेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकश फुंडकर यांनी या प्रश्नावर संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप तशी बैठक झालेली नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या मुंबईतील बाजाराच्या आवारात बांगलादेशींचा झालेला शिरकाव रोखण्यात यावा. माथाडीमध्ये घुसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा. टाटा मोटर्सच्या पिंपरी-चिंचवड येथील प्रकल्पातील माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याची, तसेच मुकादमाच्या हत्येची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.