Ajit Pawar, Nawab Malik sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Group News : नवाब मलिक अजितदादांना भेटले; बंद दाराआड दीड तास चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Latest News : राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील 'देवगिरी' बंगल्यावर दाखल झाले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड दीड तास चर्चा झाली. या भेटी मागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पण या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकारीही होते. नेमके या बैठकीवेळी मलिक तिथे पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयाने जामीन दिल्यानंतर नवाब मलिक हे नागपूरमधील विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसले होते. नवाब मलिक हे अजित पवार गटातील सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अधिवेशनातील वातावरण तापले होते. नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी आहेत. मधल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या घडामोडी झाल्या. त्यावेळी नवाब मलिक कोणाच्याही सोबत नव्हते. त्यांचा कुठलाही संबंध आला नाही, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले होते.

नवाब मलिक यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा समावेश करण्यास भाजपचा विरोध आहे. अधिवेशनादरम्यान भाजपने जाहीरपणे हा विरोध केला होता. मात्र, आता दोन आठवड्यांनी पुन्हा मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी अद्याप जाहीर भूमिका मांडलेली नाही. मलिक शरद पवार गटाच्या बाजूने आहेत की अजित पवारांच्या हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे कोणाच्या बाजूने हा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. पण नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने ते अजित पवार गटात असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून विरोध केला. मलिकांवरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना महायुतीत घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी मांडली. फडणवीसांच्या या पत्राने खळबळ उडाली होती. त्यानंतर अजित पवार गटानेही मलिकांबाबत सावध भूमिका घेतली आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT