Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

वानखेडे रडारवर; एनसीबीची एसआयटी जुनी प्रकरणेही उकरून काढणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या चौकशीसाठी एनसीबीने उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह (Dnyaneshwar Singh) यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले आहे. हे पथक दुसऱ्यांदा मुंबईत आले असून, चौकशीत अनेक बाबी समोर आल्या असून, वानखेडे यांचीही पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून एकूण सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच दिल्ली एनसीबीचे पथक आर्यन खान प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीवरून मुंबईत दाखल झाली होती. या टीमने सहा प्रकरणांचाही तपास सुरूही केला आहे. या प्रकरणांच्या तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हे पथक आज दिल्लीला रवाना होणार आहे. या पथकाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीचे पथक फक्त कार्डिलिया क्रूझ प्रकरणाचाच तपास करत नाही. आधीच्या प्रकरणांमध्ये वानखेडे यांनी प्रोटोकॉल पाळला होता का, हेसुद्धा तपासत आहे. यामुळे गरज पडल्यास हे पथक पुन्हा वानखेडेंची चौकशी करणार आहे. या पथकाने या वेळी 7 जणाची चौकशी केली आहे. पहिल्या वेळी आणि आता असे एकूण 15 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या एसआयटीने विजय पगारे यांचा जबाब नोंदवल्यानंतर एनसीबीनेही त्याचं जबाब नोंदवला आहे. याचबरोबर आर्यन खानचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सर्वांचे जबाब लेखी घेण्यात आले असून, त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.

या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल हा जबाब देण्यासाठी समोर आल्याने तपासाला गती मिळाली आहे. साईलच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख असलेल्या सर्वांना समन्स बजावून चौकशीला बोलावण्यात येणार आहे. आणखी एक पंच के. पी. गोसावी याचा ताबा मिळेपर्यंत या प्रकरणात अन्य कुणाचा कसा संबध आहे, हे समजू शकणार नाही. यामुळे गोसावीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाकडे त्याचा ताबा एनसीबी मागणार आहे. याचबरोबर शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचीही चौकशी करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच प्रकरणांचा तपास एनसीबीच्या मुंबई विभागाकडून काढून घेण्यात आला आहे. यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे. वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरणी झालेले गंभीर आरोप बघता एनसीबीने या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. एनसीबीचे उपमहासंचालक संजयकुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे पथक पुढील तपास करीत आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास काढून घेतल्याचा इन्कार वानखेडे यांनी केला होता. मी स्वतःहून आपल्याकडून तपास काढून घेण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे माझ्याकडून हा तपास काढून घेतला नाही तर माझ्या विनंतीनुसार तो दुसऱ्याकडे दिल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT