NCP New President
NCP New President  Sarkarnama
मुंबई

Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

सरकारनामा ब्युरो

NCP New President : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा या निर्णयावर राष्ट्रवादीसह अन्य पक्षाच्या नेत्यांनीही त्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. पवारांच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (Ajit Pawars ultimate goal is to become the chief minister of Maharashtra thackeray group)

ठाकरे गटाचे मुख्यपत्र 'सामना'मधून शरद पवार यांच्या निर्णयावर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाष्य केलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीमधील सध्याच्या परिस्थितीवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

शरद पवार यांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली हे स्पष्ट दिसते. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी नेते करीत असताना अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. ‘पवारसाहेबांनी राजीनामा दिला. ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या संमतीने दुसरा अध्यक्ष निवडू,’ असे अजित पवार म्हणतात. हा दुसरा अध्यक्ष कोण? असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपाचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? हा पहिला प्रश्न. विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? हा दुसरा प्रश्न, असे या ठाकरे गटाने म्हटले आहे.

पवार हे पूर्णवेळ राजकारणी..

माणसाला जास्त मोह नसावा व कधीतरी थांबायला हवे हे खरेच, पण राजकारणातला मोह कुणाला सुटला? धर्मराज व श्रीकृष्णालाही सुटला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर स्वतःला फकीर मानतात. मात्र त्यांनाही राजकीय मोहमायेने जखडून ठेवले आहे. त्यात पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही, असे अग्रलेखात नमूद केलं आहे.

वडिलांची उंची गाठण्यासाठी...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आहेत व पवारांचा पक्ष हा महाराष्ट्र केंद्रित आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळण्याचा वकुब असलेला नेता निवडताना काळजी घ्यावी लागेल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, सल्ला सल्ला ठाकरे गटाने दिला आहे.

हा एक धक्का प्रयोग ?

शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटना व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी, जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा शक्यता अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

पवार हे या घडामोडींचे नायक

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी . शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT