MLA Rohit Pawar  Sarkarnama
मुंबई

MLA Rohit Pawar : महाभारतातील 'तो' प्रसंग सांगत रोहित पवारांनी विरोधकांना डिवचलं

Ganesh Thombare

Mumbai News: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला. या निर्णयानंतर अजित पवार गट जल्लोष साजरा करत आहे. तर शरद पवार गटाकडून या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (MLA Rohit Pawar)

आमदार रोहित पवार यांनीदेखील यावर भाष्य करत अजित पवार गटाला सुनावलं आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढणार असून, शेवटी विजय आमचाच होणार!", असा विश्वास रोहित पवारांनी 'एक्स'व लिहिलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. तसेच महाभारतातील एक प्रसंग सांगत अजित पवार गटाला रोहित पवारांनी डिवचलं आहे.

रोहित पवारांनी 'एक्स'वर काय म्हटलं ?

"महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला. पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे ? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं, तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला.

नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय ? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल, म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला. कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते..."

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय...'महाशक्ती'च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं. त्यातून प्रेरणा घेऊन आदरणीय पवारसाहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!", असं रोहित पवारांनी 'एक्स'व लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT