Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Speech: वाट पाहिली पण साहेबांचा 'आशीर्वाद'च मिळाला नाही; अजितदादांनी व्यक्त केली खंत

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On NCP Crisis : १९६७ मध्ये त्यांनी बारामतीतून राजकारण सुरू केले. त्यावेळी सर्व जनता त्यांच्या पाठिशी होती. त्यानंतर १९९१ आम्ही राजकारणात आलो. आम्हीही त्यांचे सर्व निर्णय मान्य केले. दरम्यानच्या काळात वेगळे निर्णय घेऊन मला 'व्हिलन' बनवण्यात आले. तेही सहन केले. पक्षातील पदे वाटपात शेवटी तरी माझे नाव येईल, असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. माझ्यात सरकार चालवण्याची धमक नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थांबावे. आता आशीर्वाद द्या, असा सल्लाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना दिला. (Latest Political News)

राज्यात रविवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी इतर आठ जणांसह राज्य सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज बुधवारी (ता. ५) दोन्ही गटांच्या मुंबईत बैठका पार पडल्या. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकांवर टीका केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्याचे पोरगं २५ वर्षांचे झाले तरी वडिलांना सांगते की तु्म्ही मार्गदर्शन करा मी पाहतो सर्व. उद्योगपतींचेही तेच असते. राजकारणात मात्र ७५ झाली, ८०, ८३ वय झाले तरी थांबायचे नाव घेत नाहीत. मला का पक्षात जबाबदारी दिली जात नाही. माझ्यात पक्ष चालवण्याची, सरकार चालवण्याची धमक नाही का, हे राज्याला माहिती आहे. मी कधीही बहिणीचा, वडीलधाऱ्यांचा अपमान केला नाही. त्यांच्या शब्दापुढे गेलो नाही. असे असतानाही वारंवार मला का डावलले गेले? पक्षात मला त्यांनी 'आशीर्वाद' का दिला नाही. त्यांनी आता थांबावे. पक्षातील तरुणांना काम करण्यासाठी मार्गदर्शन करावे. अशिर्वाद द्यावा."

शरद पवारांचे राजकारण सर्व राज्याने पाहिले असे म्हणत अजितदादांनी सर्व इतिहासच सांगितला. अजित पवार म्हणाले, "राज्यात पुलोद सरकार स्थापन करून उलथापालथ केली. त्यानंतर सोनिया गांधींचा परदेशीचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि पुन्हा काँग्रेसची साथ दिली. २००४ मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी दवडली. २०१४ मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. २०१७ मध्ये शिवसेनेला विरोध करून सत्तेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर २०१९ मध्ये मात्र शिवसेनेला जवळ केले."

पवारांच्या राजीनामा नाट्यावरही अजित पवारांनी यावेळी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, "मध्यंतरी त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासही आम्ही तयार होतो. मात्र त्यांनी दोन दिवसांनी राजीनामा माघारी घेतला. राजीनामा माघारी घ्यायचाच होता तर द्यायचाच कशाला? त्यावेळीही मलाच लक्ष्य करण्यात आले."

Edited by Sunil Dhumal

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT