मुंबई

Bacchu Kadu : नवाब मलिक यांच्यामुळे अजितदादांची फसगत, मजा येणार आहे; बच्चू कडू असे का म्हणाले....

Pradeep Pendhare

Bacchu kadu : विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी एक एक मतांची जुळणी केली जात आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी लागलेत. यातच भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहाचा आरोप केलेले आमदार नवाब मलिक यांनी काल अजितदादा पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली. त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली. "अजितदादा यांची नवाब मलिक यांच्यावरून आता फसगत झाली आहे. त्यावर ते कसे मार्ग काढतात आता हे पहाणे उत्सुकतेचे ठरेल आणि मजा येईल", असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काल देवगिरी बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावली. तत्पूर्वी आमदार नवा मलिक यांनी विधिमंडळात देखील हजेरी लावली होती. नवाब मलिक यांनी अजित दादांनी आयोजित केलेल्या बैठकीत हजेरी लावल्याने नवाब मलिक हे अजितदादा गटाकडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु महायुतीमध्ये भाजपबरोबर (BJP) असलेल्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गट यांची यावरून अडचण झाली आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले होते. तसे सभापती यांना पत्र देखील दिले होते. हे पत्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले.

नवाब मलिक देशद्रोहाच्या आरोपांमध्ये काही काळ तुरुंगात देखील होते. वैद्यकीय पेरोलवर सुटलेले नवाब मलिक यांनी नागपूर अधिवेशनात देखील हजेरी लावली होती. परंतु ते तेथे तटस्थ होते. त्यांनी एकटेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (Ajit Pawar) गट यांच्या कार्यालयात हजेरी लावली. तेथून परतत असताना देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे आमने-सामने आले होते. याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. आता मुंबई पावसाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काल विधिमंडळात हजेरी लावली होती. यानंतर अजितदादा पवार यांनी आयोजित केलेल्या देवगिरी बंगल्यावर नवाब मलिक बैठकीला हजर होते. त्यामुळे नवाब मलिक हे अजितदादा बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. यावरून विरोधकांमध्ये चर्चेला पेव फुटले आहे.

काँग्रेस नेते विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिक यांच्या भूमिकेबाबत अजित पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली. आमदार बच्चू कडू यांनी अजितदादांची फसगत झाल्याची टिपणी केली आहे. आमदार बच्चू कडू म्हणाले, "नवाब मलिक यांनी बैठकीला हजेरी लावून अजितदादांची फसगत केली. अजितदादा हे भाजपबरोबर महायुतीमध्ये आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केलेत. नवाब मलिक यांची बैठकीला हजेरी म्हणजे अजितदादांची फसगत आहे. या फसगतीतून अजितदादा कसे मार्ग काढतात, याची उत्सुकता आहे. मजा येणार आहे". नवाब मलिक यांच्यावरील देश द्रोहाचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. ते फक्त आरोप आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे अजितदादा यावर मार्ग काढतील, असेही बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT