Anand Paranjpe Sarkarnama
मुंबई

Anand Paranjpe News : तथाकथित आपले सरकार, गतिमान सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ : आनंद परांजपेंचा हल्लाबोल

राहुल क्षीरसागर

Thane News : दहावी आणि 12 वीचे निकाल लागले असून महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, या प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले वाटप करणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे. गेल्या दहा दिवसांपासून महाऑनलाईन पोर्टल हे संकेतस्थळ बंद असल्याने दाखले वाटप प्रक्रिया ठफ्प झाली आहे. मात्र, आपले सरकार- गतीमान सरकार असा दावा करणाऱ्या या शिंदे-फडणवीस सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी ट्वीट द्वारे केला आहे.

सध्या शैक्षणिक सत्र सुरु असून विविध ठिकाणी दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात येत आहेत. मात्र, महाऑनलाईन पोर्टल दिवसा पूर्णत: बंद असल्याने दाखल्यांची आवक वाढत आहे. मात्र, महाऑनलाईन पोर्टल बंद असल्याने दाखले मंजुरीकरीता पुढे पाठवता येत नाही. संकेतस्थळ अपडेट करण्याच्या नावाखाली हे संकेतस्थळच बंद असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेष, म्हणजे संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम दिवसा केले जात आहे. रात्री काही काळासाठी हे संकतेस्थळ सुरु होते.

मात्र, लागलीच ते बंद होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले, अधिवास व रहिवास दाखले मिळत नाहीत. त्या अभावी महाविद्यालय प्रवेश रखडले आहेत, असा आरोप परांजपे यांनी केला. अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या यादीनुसार प्रवेश घेण्याची मुदत सोमवारी संपली आहे. मात्र, दाखल्यांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेताच आला नसल्याचे दिसून आले आहे, असेही परांजपे म्हणाले.

एकीकडे गतीमान सरकार असल्याचा दावा करणाऱ्या या शिंदे-फडणवीस सरकारला शासकीय संकेतस्थळ गतीमान करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नेहमी आपल्या भाषणामध्ये हे सरकार सर्वसामान्यांचे आहे; हे सरकार गतीमान आहे, असे सांगत असतात. मात्र, या तथाकथीत गतीमान सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा चालविला आहे, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

दरम्यान, शाळा तसेच महाविद्यालयीन प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांकडून विविध दाखल्यांची मागणी केली जात आहे. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांना तहसिलदार कार्यालयामध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे. विहीत मुदतीत दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळा तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी तसेच शैक्षणिक व इतर ज्या परीक्षा असतील त्यांच्यासाठी दाखले सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही परांजपे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT