Sudhir Mungantiwar, Jitendra Awhad
Sudhir Mungantiwar, Jitendra Awhad sarkarnama
मुंबई

'एवढेच सांगा, नमस्कार म्हटल्यावर किती दिवस जेलची शिक्षा!' आव्हाड संतापले

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या संदर्भात आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रामध्ये माणसे एकमेकांना भेटल्यानंतर 'नमस्कार' असे म्हणून संभाषणाला सुरुवात करतात. टेलिफोनवर बोलताना 'हॅलो' हा शब्द सगळ्यांच्याच तोंडात असतो. गावाकडे जाता-येता कोणी दिसले कि आपल्या कानावर 'राम राम' हे शब्द पडतात. काही जण एकमेकांना भेटल्यावरती 'जय शिवराय' म्हणतात. तसेच काही जण संभाषणाची सुरुवात आणि शेवट 'जय भीम' ने करतात. काही जण आपल्या संभाषणाची सुरुवात 'जय हिंद' ने करतात. तर अनेक जण 'जय ज्योती' ने करतात.

प्रश्न असा आहे कि, वंदे मातरम म्हणावेच लागेल. संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करावीच लागेल हा फतवा कशासाठी आहे. या फतव्यातून तुम्ही काय साधू इच्छिता. आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ते पारतंत्र्याच्या जोखाड्यातून मोकळा श्वास घेण्यासाठी. त्या स्वातंत्र्यानंतर आपण संविधान स्विकारले आणि त्या संविधानात भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असे दोन्ही हक्क अबाधित ठेवण्यात आले. हे हक्क हिरावून घेणारे तुम्ही कोण ? असा रोखठोक सवाल आव्हाड यांनी केला आहे.

जय हिंद म्हणायचे असेल मला तुमची परवानगी लागणार आहे का? ती देणार आहात का? किंवा नमस्कार करुन कोणाला संभाषणाची सुरुवात करायची असेल तर तुम्हांला परवानगी मागावी लागेल का? त्यासाठी काही लायसन्स मिळणार आहे का? जोरजबरदस्तीचे राजकारण हे अशा पद्धतीने तुम्ही राबवू शकणार नाही. शब्दांमध्ये भावना असतात. भावनांमध्ये प्रेम असते, आदर असतो. तो कुठल्या भाषेतून आणि कुठल्या शब्दातून व्यक्त करावा हे त्या माणसाचे स्वातंत्र्य असते. ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी मुनगंटीवार यांचा समाचार घेतला.

मी तुम्हांला नमस्कार करेन. संभाषणाची सुरुवात करताना तसेच संभाषण संपवून उठताना जय भीम करेन. तुम्हांला याचा राग येणार आहे का? मला स्पष्टपणाने सांगायचे आहे कि अशी जबरदस्ती कोणीच सहन करणार नाही. संभाषणाची आणि संवादाची सुरुवात कशी करायची आणि त्याचा शेवट कसा करायचा हे प्रत्येक माणसाची भाषा बोलण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही काय म्हणावे हे तुम्ही आम्हांला सांगू शकत नाही. आणि तुमचे आम्ही ऐकणारही नाही. एवढेच सांगा, कि नमस्कार म्हटल्यावर किती दिवस जेलची शिक्षा देणार आहात, असा जोरदार टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT