Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crisis Live: आमदार म्हणजे कांदा-बटाट्याचा भाव नाही; जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं

सरकारनामा ब्यूरो

NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकांच्या माध्यमातून दोन्ही गटांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत वाचून दाखवत पक्षावर दावा सांगणाऱ्या अजित पवारांना थेटच सुनावलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला कोणीही हात लावू शकत नाही. मात्र, सध्या संविधान पायदळी तुडवलं जात आहे. आमदार म्हणजे खरेदी-विक्री संघ नाही. आमदार म्हणजे कांदा- बटाट्याचं भाव नाही. मात्र, सध्याची सर्व परिस्थिती अवघड आहे. सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. निवडून आलेला आमदार आणि राजकीय पक्षाचं नातं हे आई आणि मुलासारखा असतं. हे नात जोडण्याच काम हा व्हिप करत असतो", असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

"शरद पवार यांनी तिकडे गेलेल्यांना सांगितलं की, माझा फोटो तुम्ही वापरू नका. मात्र, तरीही आजच्या सभेत शरद पवारांचे फोटो वापले आहेत. तुम्हाला सर्व गोष्टीसाठी शरद पवार लागतात, मग अचानक उठतात आणि शरद पवारांना सोडून जातात. जर तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही पवारांचा चेहरा का वापरता?", असा सवालही यावेळी जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "शरद पवारांनी घाम गाळून हा पक्ष उभा केला आहे. तुम्हाला ज्या बापाने उभा केलं. त्या बापालाच तुम्ही दु:ख देता. एवढंच नाही तर आमचा गुरू शरद पवार आहे, असं म्हणता आणि त्यांनाच दु:ख देता. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भुजबळांना शरद पवारांनी 25 वर्ष मंत्री केलं. त्यांच्यासाठी काय कमी केलं होतं".

"एवढं काम करूनही वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना त्रास देता. पण शेवटी आम्ही ही लढाई जिंकणारच. शरद पवारांना अंधारात ठेवून हे सर्व काम तुम्ही केलेलं आहे. कालपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होते, आज त्यांच्याच पाया पडता? कशासाठी? पण एक खरं आहे की, सर्व नद्या समुद्राला मिळतात पण समुद्र कधीही समुद्राला मिळत नाही", असं म्हणत अजित पवारांवर जोरदार टीका केली.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT