Sharad Pawar On Ladki Bahin Yojana Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana : "विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार नाही, पण पैशांचा..."; शरद पवार स्पष्टचं बोलले

Jagdish Patil

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटीहून अधिक महिलांना वाटल्याचं सरकार म्हणत आहे. अजून दोन हप्ते ते महिलांना देतील. मात्र, निवडणुकीवर या योजनेचा फार काही परिणाम होणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत केलं आहे.

शिवाय बहि‍णींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न अशा विविध गोष्टींचा बहीण विचार करेल. योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यामुळे त्यांची सत्ता पुन्हा राज्यात येईल, अशी स्थिती नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं.

महायुती (Maayuti) सरकारची लोकसभेच्या (Lok Sabha) निवडणुकीतील कामगिरी निराशाजनक आहे. या निवडणुकीत युतीपेक्षा आघाडीला भरघोस यश मिळालं. याच यशाच्या जोरावर आता विधानसभेलाही आमचीच सत्ता येणार, असा दावा आघाडीकडून केला जात आहे.

तर दुसरीकडे लोकसभेमुळे काहीसा कॉन्फिडन्स कमी झालेल्या महायुतीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महागाई, महिलांवरील अत्याचार, अशा विविध मुद्द्यांमुळे कोंडीत सापडलेल्या युती सरकारला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ने काही प्रमाणात का होईना तारलं आहे. याच योजनेच्या जोरावर युती विधानसभेच्या मैदानात उतरली आहे. योजनेच्या प्रचारासाठी सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.

महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे 3000 रुपये सरकारने जमा देखील केले आहेत. त्यामुळे काही महिला समाधानी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींचा आशीर्वाद आमच्या बरोबर असून त्या आम्हालाच मतदान करतील असा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, या योजनेचा परिणाम फारसा होणार नसून युतीची सत्ता पुन्हा येण्याची स्थिती राज्यात नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

या योजनेवरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, मोदी (Narendra Modi) सरकारच्या दोन टर्म झाल्या आणि आता तिसरी सुरु आहे, इथं येऊन ते या योजनेचं कौतुक करुन गेले.

मात्र, त्यांना त्या काळात बहिणींच्या व्यथा, दु:ख दिसलं नाही का? ठाकरे सरकारचा काळ सोडता राज्यात त्यांचीच सत्ता आहे त्या काळातही त्यांनी बहिणींच दु:ख दिसलं नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर राज्यातील बहिणी बेरोजगारी,महागाईचा विचार करतील. रोजचं वर्तमान पत्रात स्त्रियांवरील अत्याचार ही बातमी नित्याचीच झाली आहे आणि ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थाने बहि‍णींना सुरक्षेची, सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि पेपरमध्ये जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी न होता ते वाढलेले आहेत.

युतीची सत्ता पुन्हा येईल, अशी स्थिती नाही

लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही. बहि‍णींच्या घरात बेकारीचा, महागाई, अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाबाबतीत भरीव कामगिरी झाल्याचं दिसत नाही. गावागावात जातो मेळावा घेतो, बहि‍णींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न उपस्थित करतात.

त्यामुळे लाडकी बहीणचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल अशी स्थिती नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलचं आपलं मत स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT