Prakash Ambedkar: राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. यामुळं शेतकऱी कोलमडून गेला आहे. त्याला पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासनानं सध्या जाहीर केलेली मदत ही अपुरी असून त्यात आणखी वाढ करणं अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर त्यांना इतर मदतीची देखील नितांत गरज असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काही मागणी मांडल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन त्यांनी सरकारला डिवचलं देखील आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? त्यांचं पत्र जसंच्या तसं वाचा...
प्रती,
मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
विषय : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याबाबत.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही, तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. बांधावर नुसतं पिकच नाही, तर शेतकऱ्यांचे स्वप्न, दिवाळीला घरात येणारे पीक देखील वाहून गेले. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. हा महापूर, महाप्रलय आहे. या अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून, गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेत मजुरांनादेखील फटका बसला आहे. बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे संकट कोसळले आहे.
राज्य सरकारने २,२०० कोटीची केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून करोडो रुपयांचा वसूल केलेला सेस राज्याच्या सकल उत्पन्नात कृषीचे १२ टक्के पैसे केव्हा कामात येतील? शासनाने दिलेली मदत कोणत्या दराने दिली, हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.
आम्ही सरकारकडे मागणी करतोय की, त्यांनी तातडीने पुढील मागण्या मान्य कराव्यात
१. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे.
२. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणे.
३. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी.
४. या संकटसमयी सरकारने तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी.
मोठ मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना त्यांना मदत करताना सरकार कुठलेच सर्व्हे, पंचनामे करत नाही. मग, शेतकऱ्यांसाठी हे सोपस्कर का आहेत? आज या ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको, तर सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही करत आहोत.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसंच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.