Uddhav Thackeray, Ram Nath Kovind Sarkarnama
मुंबई

One Nation One Election : "रामनाथ कोविंद हे..."; 'वन नेशन, वन इलेक्शन'ला विरोध करताना ठाकरेंच्या नेत्याची जीभ घसरली...

Jagdish Patil

One Nation One Election : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'वन नेशन, वन इलेक्शन'चा हा कार्यक्रम राबवण्या संदर्भातील अहवाल मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारला सोपवला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने या अहवालावर शिक्कामोर्तब करत या संकल्पनेला मान्यता दिली आहे.

मात्र, केंद्राच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्राच्या याच 'वन नेशन, वन इलेक्शन' या निर्णयाचा विरोध करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे.

अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, "देशाच्या गरजा काय आहेत आणि प्राथमिकता काय आहेत? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका हरियाणा सोबत का नाही घेतल्या? ज्यांना दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेता येत नाहीत, ते किती खोटं आणि दांभिक लोक आहेत हे दिसून येत आहे. बिलमधे काय प्रावधान आहे ते पहावं लागणार आहे."

तर यावेळी त्यांनी कोविंद म्हणजे भाजपच्या (BJP) पिंजऱ्यातील एक पोपट असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, "अधिवेशन येईल तेव्हा हे बिल येईल आता गरजा काय आहेत ते पाहावं. देशातील इतर समस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रादेशिक पक्ष यांना नकोच आहेत. त्यांचा हा जुना विषय आहे.

राज्याला विचारलं जाणार नाही म्हणजे ही हुकुमशाही आहे. कोविंद म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातील एक पोपट आहेत. ते आता राष्ट्रपती नाहीत. हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचत आहेत ते बघा," अशा शब्दात सावंत यांनी माजी राष्ट्रपतींवर टीका केली. सावंत यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

महापालिकांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील या 'वन नेशन, वन इलेक्शन' या निर्णयावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, भारत हा खूप मोठा देश आहे. देशात प्रचंड लोकसंख्या आहे. या देशात अनेक राज्ये आहेत, प्रत्येक राज्यात विविधता आहे, वेगवेगळ्या भागात वेगवेगळं हवामान आहे.

या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घटनाकारांनी कधीच एक राष्ट्र एक निवडणूक असा विचार केला नाही. त्यांनी राज्यांच्या निवडणुका वेगळ्या आणि देशाची निवडणूक वेगळी ठेवली. मात्र, भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

तर लोकसभा निवडणूक व विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. जेणेकरून ईव्हीएममध्ये एकदाच घोटाळा करायचा, यंत्रणा हाताशी धरून एकाच वेळी सर्व निवडणुका जिंकायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना एक राष्ट्र, एक निवडणूक घ्यायची असेल तर आधी महापालिकांच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवाव्या, असा टोला देखील राऊतांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT