Elvish Yadav Sarkarnama
मुंबई

Elvish Yadav Case : 'एल्विश' प्रकरणावरून विरोधक आक्रमक, तर शिंदे-फडणवीसांकडूनही प्रत्युत्तर, म्हणाले...

Sachin Waghmare

CM Shinde and Elvish Yadav : रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एल्विश यादवने वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारामुळे विरोधकांनी मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धाऊन आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना क्लीन चिट दिली. तर विरोधकांना काहीच कामे नाहीत? आम्ही कामे करतो, विरोधकांना काही काम उरलंय का ? रोज आरोप करीत राहणे एवढेच काम विरोधकांना उरले आहे. त्यामुळे आम्ही कामातून उत्तर देतो, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त एल्विश यादव हजर होता. त्याच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले.

पाच जिवंत कोब्रा आणि बंदी घालण्यात आलेले विष एल्विश यादवच्या घरात सापडल्याने तो अडचणीत आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, एल्विश हा मुंबईत लपला होता. गणेशोत्सवाच्या काळात तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेला होता. त्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत.

फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण -

याविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण वर्षा बंगल्यावर जात असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी जात असतात. एल्विश यादव हा त्यावेळी बिग बॉस हा रिआलटी शो जिंकला होता. तो एक सेलिब्रिटी होता, असे अनेक सेलिब्रिटी तेथे जात असतात.''

तसेच, ''ज्यावेळी एल्विश यादव वर्षा बंगल्यावर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर आरोप नव्हता. आता त्याच्यावर आरोप आहेत, असा जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो, तर राज्यातील अनेक पुढाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. उबाठा गटाचे जे नेते आहेत, त्यांच्याकडून आरोप केले जात आहेत,'' असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी केली टीका -

दरम्यान, एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी जातो. त्याला त्यांच्या गटातील एक खासदार घेऊन जातो. या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केलं होतं? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याचा काय संबंध, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

विरोधकांना काही काम उरले नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “ विरोधकांना काही काम उरले नाही. दररोज आरोप करणं हेच विरोधकांना काम आहे. आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरू करतोय. तुम्ही इगो ठेवून अनेक कामे बंद केली होती, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. रोज सकाळी उठलं की त्यांना तेच काम आहे," असे शिंदे म्हणाले.

(Edited by - Mayur Ranaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT