Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama
मुंबई

शरद पवार म्हणाले, माझ्यावर अनेकांनी आरोप केले; पण...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. कधी काळी टीका, आरोप झाले. मात्र, त्याची फिकीर केली नाही. अनेकांनी आरोप केले. मात्र, ते आरोप खरे नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचे भूमिपुजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), हसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, राज्य सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करावा. घरांच्या कामाला जास्तीत जास्त गती द्यावी. ज्याठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, तिथे धाडसाने घ्यावा. गोरेगाव येथे आल्यानंतर दोन गोष्टींची मला प्रामुख्याने आठवण होते. लहान उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई शहरात ज्यांनी संघर्ष केला, अशा व्यक्तींच्या नामावलीत मला प्रथम मृणालताई गोरे यांची आठवण होते. आज ज्या मैदानात भूमिपूजन होत आहे इथेही मृणालताईंच्या जाहीर सभेसाठी मी आलो होतो, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

आज मृणालताई आपल्यात नाहीत. मात्र, त्यांना ज्या प्रश्नांमध्ये आस्था होती. त्या प्रश्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून लक्ष घालत आहेत. घर, निवारा या काही लहानसहान गोष्टी नाहीत. या महाविकास आघाडी सरकारने काही गोष्टी हाती घेतलेल्या आहेत आणि त्या गतीनेच पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामध्ये निवास हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचेही पवार यांनी सांगितले. वरळी मधील बीडीडी चाळीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. त्याचे भूमिपूजनही एक-दोनदा झाले. मात्र, त्या कामाला गती नव्हती. जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून जबाबदारी हाती घेतल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने या कामाला सुरुवात केली.

घरांच्या प्रश्नासंबंधी राज्य सरकारला माझी एक सूचना आहे. सामान्य माणसांच्या घरांसोबतच पोलिसांच्या घरासंबंधीही सरकारने लक्ष द्यायला हवे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांच्या जुन्या निवासी जागा आहेत. ती घरे वाईट स्थितीत आहेत. जागा मोठ्या आहेत, मात्र घरे चांगल्या स्थितीत नाहीत. पोलिस आपले रक्षक आहेत. दिवसाचे १६ तास ते काम करतात. त्यांच्या कुटुंबातील लोकांना चांगला निवारा मिळण्यासाठी आपण लक्ष घालूया. महाराष्ट्रातील गृह खाते आणि गृहनिर्माण खाते यांनी एकत्र बसून प्रस्ताव तयार करावा. व्यावसायिक दृष्टीकोनातून, उत्पन्न साधनाचा विचार करून या उत्पन्नातून पोलिसांना दर्जेदार घरे कशी देता येतील, याचा विचार करावा. माझी खात्री आहे, अशा पद्धतीने विचार केल्यास महाराष्ट्रातील विविध भागातील पोलिसांच्या कुटुंबांना समाधान लाभेल, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT