Devendra Fadnavis, Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

PM Modi in Maharashtra : ठाकरेंना उद्घाटनापासून कुणी रोखलं?

सरकारनामा न्युज ब्युरो

Mumai Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नाशिक आणि मुंबई दौरा मोठ्या दणक्यात झाला. हा दौरा जरी शासकीय होता तरी यात राजकीय रंग दिसले, अशी टीका होऊ लागली आहे. तरीही सर्वांच्या लक्षात आलेली बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापासून ठाकरे गटाला पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व प्रयत्नपूर्वक केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या शिवडी ते न्हावाशेवा अटलसेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन सोबतच दिघा रेल्वे स्टेशन आणि नवी मुंबईतील मेट्रोचे उद्घाटन होते. या तिन्ही उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक आमदार, खासदारांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. आता हे स्थानिक आमदार, खासदार ठाकरे गटाचे होते, याला निव्वळ योगायोग म्हणायचं का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

अटलसेतूच्या उद्घाटनाला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, अजय चौधरी यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर नव्हतं. वास्तविक स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रण देण्याची प्रथा आहे. इथं या प्रथेला डावललं गेल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे.

अरविंद सावंत (Arvind Sawant)यांच्या घरी आज (12 जानेवारी) सकाळी आमंत्रण पोहचवण्यात आलं. त्यावेळी 'तुमचा पत्ता उशिरानं सापडल्यानं आमंत्रण उशिरा देत आहोत' असं कारण देण्यात आलं. अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे अनेक वर्षे खासदार आहेत. तरीही त्यांना पत्ता सरकारला सापडत नसेल, तर ही गंभीर बाब आहे.

इकडे ठाण्यात खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबाबतही असेच झाल्याचा आरोप आहे. दिघा रेल्वे स्टेशन आणि नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका त्यांना उद्घाटनापूर्वी काही तास मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम राज्य सरकारचा की पक्षाचा, असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सरकारला विचारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या आमदार-खासदारांना अशी वागणूक मिळत असल्याचा आरोप होत आहे. पण काही वर्षांपूर्वी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या सोहळ्यातही उद्धव ठाकरेंना अशीच दुजाभावाची वागणूक मिळाल्याची चर्चा होती.

2014 मध्ये भाजपने शिवसेनेशी युती तोडली होती. तशी घोषणा तत्कालीन भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. पण निवडणूक निकालानंतर भाजपला बहुमत न मिळाल्याने काही महिन्यांनंतर भाजप-शिवसेना पुन्हा सत्तेत आले. त्यावेळी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळीही ठाकरेंना शपथविधीला बोलावताना खूप तणाव निर्माण झाला होता.

त्यामुळे ठाकरे आणि भाजपचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव होता. तेव्हा 'खिशात राजीनामा घेऊन असतो' अशी भाषा शिवसेनेकडून केली जात होती.

पुढे 2019 मध्ये शिवसेनेने भाजपाला बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली आणि भाजप-शिवसेनेत मोठा दुरावा निर्माण झाला. पुढे शिंदे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून भाजपने त्यांना घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप आणि ठाकरे यांच्यातून विस्तवही जाणे बंद झाले. त्याची परिणीती पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दिसून आल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT