Mumbai News, 03 Feb : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा दावा भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला होता.
त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पियुष गोयल यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, एक वरिष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले आहेत. या माहितीची सत्यतेची पडताळणी न करता याबाबत मी मीडियासोबत बोललो, असं म्हणत त्यांनी आपला दावा खोटा आणि चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं.
मात्र, गोयल यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अजित पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नको, असं म्हटलं होतं. तर याच सर्व राजकीय चर्चांवर आता प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांनी कधी एक मतही मिळवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, ते लोक आमच्यासारख्या लोकांबद्दल उलट सुलट चर्चा करतायत ते योग्य आहे का? 1952 पासून माझ्या वडीलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले, मलाही महाराष्ट्रातील जनतेकडून निवडून दिलं, आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कमेंट करत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे."
तसंच यावेळी त्यांनी मी एक जन प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर बसलो असून पक्षाचा निर्णय योग्य दिशेने होईल आणि योग्य व्यक्तीने होईल आणि माझ्याशिवाय होईल यापलिकडे मी काय सांगू असं म्हणत त्यांनी आपण पक्षाचा अध्यक्ष होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
मात्र, उगाच आमच्या पक्षात संशय निर्माण करणं ही घाणेरडी गोष्ट असून मला यापलीकडे काही बोलायचं नाही, आमचा पक्ष योग्य निर्णय घेणार आहे. माझ्याशिवाय पक्षाचा कोणीतरी अध्यक्ष असेल, अजितदादांनंतर कोण, कसं, कधी ही जबाबदारी माझ्यावर आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन, असं म्हणत त्यांनी अध्यक्षपदाच्या निर्णय प्रक्रियेत आपण असल्याचंही सांगून टाकलं.
यावेळी राज ठाकरे यांच्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारताच पटेल म्हणाले, "राज ठाकरे ठाकरे माझ्या पक्षाचे आहेत का? त्यांनी माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण हे ठरवायचं आहे का? अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवायचं की, राज ठाकरे किंवा इतर कोण जे आहेत सकाळी नऊ वाजताचे बुलेटीन वगैरे, वगैरे हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात आम्ही आमच्या पक्षांमध्ये काय करायला पाहिजे", असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, त्यांनी यावेळी पियुष गोयल यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला, "काही लोकं उलट सुलट बातम्या करत आहेत. विनाकारण काही नाव काढत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आणि मी तुम्हाला सांगतो कधीच मी या स्पर्धेमध्ये नव्हतो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या एकाने जरी माझं नाव घेतलं आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे. अध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचं स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.