prajakt tanpure
prajakt tanpure Sarkarnama
मुंबई

प्राजक्त तनपुरे म्हणाले, वीजकंपन्यांचे खासगीकरण करणार नाही...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारच्या वीज विधेयक 2021 च्या विरोधात व राज्यातील विविध शहरांच्या खासगीकरण विरोधात राज्यातील वीज कंपन्यांतील विविध 26 कामगार, अधिकारी व अभियंता संघटनांनी एकत्रित येत आज आझाद मैदान येथे आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा केली. ( Prajakta Tanpure said, privatization of power companies will not be done ... )

वीज कंपन्यांतील कामगार, अधिकारी व अभियंत्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय आंदोलनास प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली. त्यावेळी आमदार भाई जगताप, आमदार बालाजी किणीकर, आमदार राहुल पाटील व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, राज्यातील 16 शहरांतील वीजकंपन्यांचे खासगीकरण होणार अशा बातम्या काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र राज्यातील या शहरांतील वीजकंपन्यांचे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, हे मी शासन प्रतिनिधी म्हणून आपणास सांगत आहे, असे प्राजक्त तनपुरे यांनी आश्वस्त केले.

प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले, मी येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेदना ऐकण्यासाठी आलो आहे. खाजगीकरणाबाबत कामगार व शेतकरी यांच्या सारख्याच भावना आहेत, त्यामुळे सरकार हा निर्णय घेणार नाही. राज्यातील हायड्रो प्रोजेक्ट जलसंपदा विभागाशी निगडित आहेत. या प्रोजेक्टमधून जनतेस आजपर्यंत कमी दरात वीज उपलब्ध झाली आहे. हे सर्व प्रकल्प महानिर्मितीच्या ताब्यात असावेत याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. विद्युत सहायक भरती प्रक्रिया विविध कारणांमुळे अडकली होती, यात न्यायालायाच्या निर्णयाच्या अधीन राहून सुमारे 3 हजारहून अधिक पदे सरकारने भरली आहेत. महापारेषणमध्येही पुढील महिन्यात भरती काढणार आहे. तर महावितरणमध्येही भरतीचा लवकरच निर्णय घेण्यात येईल.

कृषी ग्राहकांसाठी वेगळी कंपनी याबाबत बोलताना ते म्हणाले, 'कृषी कंपनी या मुद्द्यास माझा व्यक्तिशः विरोध आहे. तसेच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने वीजबिल वसुली का करावी लागत आहे याची बाजू विधानसभेतही मांडली आहे. पीक पद्धतीवर आधारित वीज बिल आकारणी करता येईल काय, क्रॉस सबसिडी वितरण वेगळ्या पद्धतीने करता येईल काय, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची चाचपणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

संघटनांच्या विविध मागण्या व प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या भरती, बदली आदी मुद्द्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वस्थ केले. तसेच कोरोना काळात केलेल्या कामासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांचे कौतुक केले. यावेळी राज्यभरातून मोठया संख्येने आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT