Mumbai News, 16 Apr : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार आमदार नरेंद्र मेहता यांच्या वादात आता सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी उडी घेतली आहे. आपल्या वडिलांना ड्रायव्हर असे म्हणताच पूर्वेश यांनी एक पत्र लिहित मेहता यांना काही राजकीय मर्यादा पाळा असा सल्ला दिला आहे.
शिवाय एक मुलगा म्हणून, मी आजही आपल्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. पण कृपया मला तीच संधी पुन्हा पुन्हा देऊ नका, असा इशारा देखील पुर्वेश सरनाईक आमदार मेहता यांना दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरमधील ३० % जमीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या आहेत, असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य मेहता यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांच्यावर बोचरी टीका केली होती.
ते म्हणाले, "प्रताप सरनाईकांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका, जर माझ्याकडे ३० टक्के जमीन असती तर प्रताप सरनाईकांना ५०० फुटावरून माझ्याशी बोलावं लागलं असतं, ते माझ्या जवळ येऊ शकले नसते. शिवाय एवढी जमीन असती तर प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते", असं वादग्रस्त वक्तव्य मेहता यांनी केलं होतं.
त्यांच्या याच वक्तव्यावरून प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहित जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, 'सर्वप्रथम, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आपल्या भव्य विजयाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जनतेने दिलेला हा कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो आणि त्याचा आदरही करतो. लोकशाहीत जनतेचा निर्णय अंतिम असतो. हे जागरूकतेने तेव्हाच प्रामाणिकपणे पटते.
मात्र, या विजयानंतर आपण आता शहराच्या विकासावर, जनतेच्या प्रश्नांवर आणि ठोस कामांवर लक्ष केंद्रित कराल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत आपल्या वक्तव्यांमध्ये केवळ प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्याचाच सूर दिसून येत आहे. जे स्वतः चार वेळा जनतेने निवडून दिलेले आमदार आणि आज राज्याचे मंत्री आहेत.
आपले अलीकडील वक्तव्य - "प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते", हे ऐकून खरोखर आश्चर्य वाटले नाही. कारण ते आपल्या राजकीय संस्कारांचे प्रतिबिंब होते. मात्र, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वातील खालच्या पातळीचा अंदाज नक्कीच आला. मेहता जी, राजकारणात मतभेद असू शकतात, विचार वेगळे असू शकतात, पण त्यात एक सभ्यता आणि मर्यादा असते. ती राखणे ही प्रत्येक जनप्रतिनिधीची जबाबदारी असते.
राजकारणात मोठेपणा शब्दांनी नव्हे, तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो. माझ्या आई-वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे. विचार जुळले नसले तरी व्यक्तीचा आदर ठेवावा. आणि तेच मी आजपर्यंत पाळत आलो आहे. तसेच, त्यांनी ही शिकवण दिली आहे की, खाली पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका कधीच करू नये. जरी राजकीय मुद्दे आणि संधी दोन्ही असतील तरी.
खरं सांगायचं तर, आमच्याकडेही अनेक संधी होत्या. “इनसाईड द टॉयलेट” सारख्या प्रसंगांवर बोलण्याच्या. पण आम्ही आणि आमचा पक्ष त्या पातळीवर कधीच गेलो नाही. कारण आमच्यासाठी राजकारण ही संस्कारांची गोष्ट आहे, केवळ स्टेटमेंटबाजी नाही. आपणही हाच आदर्श ठेवावा, ही नम्र अपेक्षा. मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की आपण मीरा भाईंदरच्या विकासासाठी काम कराल.
ज्या शहरासाठी माझे वडील अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आले आहेत. एक मुलगा म्हणून, मी आजही आपल्या अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. पण कृपया मला तीच संधी पुन्हा पुन्हा देऊ नका. कारण संयम हा आमचा स्वभाव आहे. कमजोरी नाही, असं म्हणत पूर्वेश यांनी एकप्रकारे मेहता यांना इशाराच दिला आहे. त्यामुळे आता या पत्रावर मेहता काय प्रत्युत्तर देणारं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.