prithviraj chauhan on shinde fadnavis government Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chauhan News : सगळं विचित्र चाललंय, हे सरकारच जनतेनं हाकलून दिलं पाहिजे; पृथ्वीबाबांचा संताप

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : 'हे गृहखात्याचं अपयश आहे. एका ठिकाणी ड्रग्ज रॅकेट हॉस्पिटलमधून चालतं. त्याचा सूत्रधार पळून जातो. मग तो पुन्हा सापडतो. मग रॅकेट मोठं बाहेर येणार, असं गृहमंत्री म्हणतात. मग तुम्ही कशाची वाट पाहताय? कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची आणि विशेषतः गृहमंत्र्यांची आहे. याबाबतीत गृहमंत्रालय अपयशी ठरलेलं आहे. आणि त्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेणं अपेक्षित आहे. कुणी जबाबदारीच स्वीकारत नाही तर नैतिक जबाबदारी कशाला कोण स्वीकारेल. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे', अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राज्य सरकारवर केली.

'सरकार कोण चालवतंय? हेच आम्हाला कळत नाही. मुख्यमंत्र्यांचा किती ताबा आहे? कोण उपमुख्यमंत्री, काय करतोय? त्यामुळे सगळं विचित्र चाललेलं आहे. त्याला एकच उपाय आहे की हे सरकार जनतेनं हाकलून दिलं पाहिजे', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचं पुढे काय होणार?

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचं पुढे काय होणार? प्रश्न पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाणांना विचारला. 'तेलगी प्रकरण आलं. त्यात मोठ-मोठ्या नेत्यांची नावं घेतली गेली. पण ते प्रकरण दडपलं गेलं. तसं आता हे शिंदे-फडणवीस-पवार सरकार आहे. ते हे सर्व प्रकरण दडपून टाकेल. उच्चपदस्थ मंत्र्यांचे यात संबंध आहेत, असे बोललं जातंय. यामुळे असं जर असेल तर हे उघड होणार नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपलं जाईल', असं पृथ्वीराज चव्हाण ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'महाविकास आघाडीत जागावाटपावरून वादावादी होणार, पण...'

'नरेंद्र मोदींच्या भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधकांची इंडिया आघाडी बनली आहे. महाराष्ट्रात ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहेत. आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवावी, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. त्यामुळे इंडिया आघाडीत जागावाटपावरून घासाघीस होईल आणि वादावादीही होईल, पण शेवटी हा ईडीचा ससेमिरा, सीबीआयची प्रकरणं आणि अन्यायकारक निधीवाटप, हे सगळं संपवायचं असेल तर हे सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरुवात लोकसभेपासून होईल. यासाठी एकास-एक उमेदवार आम्हाला द्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत आव्हान राहणार नाही, पण लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला तर विधानसभा निवडणूकच होणार नाही. कारण लोकशाही राहणार नाही', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT