Raj Thackeray, Narhari zirwal  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : राज ठाकरे भडकले; म्हणाले, 'मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून...'

Sachin Waghmare

Mumbai News : धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह इतर दोन आमदारांनी आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या. याप्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षणाला विरोधासाठी नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आक्रमक होत हा प्रकार केला. मात्र, या प्रकारानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका करताना महायुती सरकारच्या कारभारावर आसूड ओढले आहेत. (Raj Thackeray News)

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आणि इतर दोन आमदारांनी, आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळीवर उड्या मारून, म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध ? असा सवाल उपस्थित करीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सडकून टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून 'जनतेच्या सेवेला सत्ता हवी', म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की. बरे मुळात तुम्ही सत्ताधारी, त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय? आदिवासी जनतेबद्दल खरंच कळवळा असेल तर, आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी, ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील, हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.

महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली आहे. त्या सर्कसीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालं आहे, आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे, मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा. माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतः पोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची, ही विकृत झालेली व्यवस्था उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे.

या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील, अशी पोस्ट करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर आसूड ओढले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT