Mumbai News: मुंबईत काल दिवसभर महायुतीच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडी घडत होत्या. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणाबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेतही आलं. क्रिकेटप्रमाणे राजकारणातही थर्ड अम्पायर असायला हवा होता, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
काल मुंबईत भारतीय क्रिकेट विश्वासाठी एक महत्त्वपूर्ण घटनाही घडली. क्रिकेटचे द्रोणाचार्य आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या महान क्रिकेटपटूला घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांची 92 वी जयंती होती. यानिमित्त मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात आलेल्या आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरणही झाले.
विशेष म्हणजे या स्मारकाचे अनावरण त्यांचा लाडका शिष्य सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. खरंतर या स्मारकाची कल्पना राज ठाकरे यांचीच होती. या स्मारकाच्या ठिकाणी दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बॅट, ग्लोव्हज, स्टम्प्स अन् आचेरकरांची ओळख ठरलेली त्यांची खास रोमिओ हॅट बसवण्यात आली.
याप्रसंगी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, 'क्रिकेट जसं बदलत गेलं, तसंच आमच्याकडेही राजकारण बदलत गेलं. क्रिकेटमध्ये अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हाला जर थर्ड अम्पायर मिळाला असता, तर मला वाटतं अनेक निर्णय बदलले असते. वेगळे दिसले असते कदाचित. पण आमच्याकडे थर्ड अम्पायर नसल्याने आम्ही काही करू शकत नाही.'
याशिवाय, 'भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं स्मारक, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलं. खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे.' असं राज ठाकरेंनी एक्सवर केलेल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
याशिवाय 'आपल्याकडे गुरूंचा उचित सन्मान करण्याची परंपरा कमी होत चालली आहे. मला बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दरवर्षी अनेक मुलं भेटायला येतात, मी त्या प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला पुढे काय करायचं आहे ? इंजिनीअर, डॉक्टर, आर्किटेक्ट अशी साच्यातील उत्तरं येतात, पण कोणीही मला शिक्षक व्हायचं आहे असं मला सांगितल्याचं आठवत नाही. चांगले शिक्षक नसतील तर चांगले विद्यार्थी कसे घडणार असा मला नेहमी प्रश्न पडतो. असो, पण हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे. ' असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.