bhagat singh koshyari- Raj Thackeray
bhagat singh koshyari- Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंचा राज्यपालांना थेट इशारा : ‘मराठी माणसाला डिवचू नका, आता इतकंच सांगतोय!’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाकडून कोश्यारी यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेण्यात येत आहे. आता महाराष्ट्र नवनिवर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर थेट ‘मराठी माणसाला डिवचू नका’ असा इशाराच राज्यपालांना दिला आहे. (Raj Thackeray direct warning to Governor Bhagat Singh Koshyari)

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं होतं. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘कोश्यारींची होशियारी’ या मथळ्याखाली प्रसिद्धीपत्रक काढून राज्यपालांना चांगलेच सुनावले आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचे पद आहे, म्हणून आपल्याविरोधात लोक बोलायला कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळंल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही काही दुधखुळे नाहीत. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.

काय म्हणाले होते राज्यपाल?

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत त्यांच्यावर आगपाखड केली आहे. ''महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे,’’ असं राऊतांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. ''महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसने राज्यपालांवर निशाणा साघला आहे. प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.'' असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT