Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

Raj Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदलाने सन्मानाने स्थापन केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा वर्षभराच्या आतच कोसळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि सर्वच स्तरातून संतापही व्यक्त होत आहे.

विरोधकांनी या मुद्य्यावरून सरकारला धारेवर धरले आहे, तर सत्ताधारी पक्षाकडूनही पुतळा कोसळ्यामागे राजकीय कट असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. एकूणच यावरून आता राजकारण तापत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे की, 'मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?'

याचबरोबर 'मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.' असं राज ठाकरेंनी म्हटलं.

''मध्यरात्र उलटल्यावर, शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा, शिवाजीराजे म्हणाले, मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले, मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राह्मणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!''

पुढे राज ठाकरे म्हणतात, 'पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. '

तसेच 'ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो.' असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT