Ratan Tata- Raj Thackeray Narendra Modi .jpg Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Letter to PM Modi : टाटांच्या निधनानंतर काही तासांतच राज ठाकरेंचं मोदींना पत्र, केली 'ही' मोठी मागणी

MNS President Raj Thackeray Letter To PM Narendra Modi After Ratan Tata Death : ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण...

Deepak Kulkarni

Mumbai News: देशातील प्रसिद्ध टाटा समूहाचे प्रमुख आणि उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी (ता.9) निधन झालं.वयाच्या 86 व्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्या निधनानंतर उद्योग विश्वासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी,लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.रतन टाटा यांच्या निधनानंतर काही तासांतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित केंद्र सरकारची कानउघडणी करतानाच मोठी मागणी केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात हे पत्र जोरदार व्हायरल झालं आहे. ठाकरे यांनी या पत्रात रतन टाटा (Ratan Tata) यांच्यासारख्या व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं.

पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे. तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही असं म्हटलं आहे.

राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले..?

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं, असे कौतुकोद्गार राज ठाकरे यांनी पत्रात काढले आहे.

पुढे ते म्हणतात,अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं.पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !

ह्या व्यक्ती 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ?

राज ठाकरे म्हणाले, काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहिले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उत्स्फूर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत,आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ? असा सवालही ठाकरे यांनी पत्रातून सरकारला केला आहे.

त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे. तसंच भारत हा रत्नांची खाण आहे.पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा.

मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला असंही रोखठोक मत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे, अशी आशाही राज ठाकरे यांनी पत्राच्या अखेेरच्या टप्प्यांत मोदींकडे व्यक्त केली आहे.

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होती. मात्र, बुधवारी (ता.9) दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांना रविवारी (ता.6 ) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT