Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News
Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News Sarkarnama
मुंबई

मला आनंद आहे..! राज्यसभेचा हाय होल्टेज ड्रामा अन् संभाजीराजेंचं ट्विट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत चालली आहे. भाजपसह महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागणार याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. निवडणुकीच्या या घडामोडींमध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी ट्विट केलं आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

संभाजीराजे यांनी सुरूवातीला राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण त्यांना कोणत्याही पक्षाने पाठिंबा जाहीर केला नाही. शिवसेना पुरस्कृत उमेदवार होण्याची अट फेटाळत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपने कोल्हापुरातीलच उमेदवार देत रंगत वाढवली. त्यामुळे संजय पवार आणि धनंजय महाडिक हे दोघेही कोल्हापुरचे उमेदवार रिंगणात असून विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

भाजपने आघाडीतील तिघांच्या तर आघाडीने भाजपचे एक व एका अपक्ष आमदाराच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. या तक्रारींची आयोगाकडून पडताळणी सुरू आहे. त्यातच संभाजीराजेंनी ट्विट केलं आहे. 'कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार,' असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीकडे दिल्याचा आक्षेप घेतला आहे.

राणा यांनी मतदानावेळी हनुमान चालिसाचे पुस्तक दाखवल्याचा आक्षेप नोंदवला आहे. आता आयोगाकडून या तक्रारीचीही दखल घेतल्याचे समजते. या कारणामुळे मतमोजणी आणखी काही तास लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप आणि आघाडीच्या तक्रारीवर आयोग काय निर्णय घेणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

तर भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप घेत आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी तिघांच्या मतदानावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला होता. पण त्याविरोधात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार आता आयोगाने ही तक्रार दाखल करून घेत तिघांच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेतला आहे.

केंद्रीय आयोगाकडून व्हिडीओ पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याबाबत आयोगाकडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरूवात होईल. आयोगाने जर आव्हाड, ठाकूर आणि कांदे यांच्या मतदान बाद ठरवले तर आघाडीच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बदलू शकतं. त्यामुळे आघाडीला मोठा फटका बसू शकतात.

हे आहेत आक्षेप

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली. त्यावर पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे.

सुहास कांदे यांच्याही मतदानावर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यांनी आपली मतपत्रिका शिवसेनेच्या प्रतिनिधीला दाखवताना ती राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला दिसेल, अशाप्रकारे व्यवस्था केल्याची तक्रार भाजपने केली आहे. त्यामुळे या तिघांचे मतदान बाद करण्याची मागणी भाजपने आयोगाकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT