Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale news : उपवर्गीकरणावरून रामदास आठवले सरकारला भिडले; समाजबांधवांना एकजूट होण्याचे आवाहन... पुढचा प्लॅनही सांगितला...

SC subclassification debate : जनगणना झाल्याशिवाय कोणतीही आकडेवारी स्पष्ट होऊ शकत नाही आणि आकडेवारीशिवाय घेतलेला कोणताही निर्णय समाजावर अन्याय करणारा ठरू शकतो, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

Rajanand More

Maharashtra political news : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. उपवर्गीकरणाशी संबंधित बदर समितीच्या अहवालावर सरकारकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. पण आकडेवारी जाहीर न करता हरकती मागविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे.

रामदास आठवले यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या सर्व समाजबांधवांना मी सांगू इच्छितो की, तुमचा हा जो आग्रह आहे की अधिकृत जनगणना झाल्याशिवाय सरकारने उपवर्गीकरणाबाबत कोणतेही पाऊल टाकू नये, तो शंभर टक्के बरोबर आहे आणि मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे.

जनगणना झाल्याशिवाय कोणतीही आकडेवारी स्पष्ट होऊ शकत नाही आणि आकडेवारीशिवाय घेतलेला कोणताही निर्णय समाजावर अन्याय करणारा ठरू शकतो. आज केवळ राजकीय स्वार्थासाठी काही विरोधक आपल्या लोकांना काहीही खोटेनाटे भरवत आहेत, समाजात संभ्रम निर्माण करत आहेत आणि अफवांचे पीक पिकवत आहेत, असे आठवलेंनी म्हटले आहे.

अर्धवट माहितीवर आणि अनधिकृत माहितीवर आधारित आपण आपापसात वाद घालून कोणताही कायदा किंवा नियम बनत नसतो, हे सर्वांनी पक्के लक्षात ठेवले पाहिजे. विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडून आपण आपापसात लढलो, तर त्यात नुकसान फक्त आणि फक्त आपल्याच समाजाचे होणार आहे, म्हणूनच मी पुन्हा सांगतो, भांडायचं नाही, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.

आज खरी गरज ही आहे की, आपण सर्व अनुसूचित जाती (SC) म्हणून आधी एकत्र आले पाहिजे, कारण आपली एकजूट हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्यात कितीही मतप्रवाह असले, तरी आपण एकत्र बसून, सखोल चर्चा करून आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच यावर एकमताने सुवर्णमध्य आणि योग्य तो तोडगा काढला पाहिजे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून हक्क मिळवून दिले आहेत, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना समाजातील शेवटच्या, अत्यंत मागास घटकाला न्याय मिळालाच पाहिजे पण तो न्याय मिळवताना संपूर्ण समाज सोबत असला पाहिजे. अधिकृत जनगणनेची वाट पाहू, वस्तुस्थिती समजून घेऊ आणि चर्चा करूनच पुढचा मार्ग ठरवू; पण कोणत्याही परिस्थितीत समाजात फूट पडू देणार नाही, हाच आपला ठाम निर्धार असल्याचे आठवले म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT