Ramdas kadam.jpg
Ramdas kadam.jpg 

Sarkarnama 

मुंबई

`मी कडवट शिवसैनिक.. गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांत पाणी आले`

सरकारनामा ब्यूरो

मुंंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी स्वपक्षाचे मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर तिखट हल्ला चढवला. सोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना लक्ष्य करत ते कोकणातून शिवसेना संपवायला निघाले आहेत, अशी टीका केली. दापोली येथील मेळाव्यात माझ्यावर परब यांनी टीका केली. माझ्याविरोधात गद्दार म्हणून कोणी घोषणा दिल्या हे मला माहिती आहे. मी गद्दार नाही. मला गद्दार म्हटल्याने माझ्या डोळ्यांत पाणी आले, अशी भावना कदम यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तटकरे यांच्या उद्योगाची कल्पना दिली. तरी तटकरे यांनी शिवसेनेचे लोक फोडल्याचा आरोप कदम यांनी केली. शिवसेनेचे दुसरे आमदार भास्कर जाधव यांनीही काही दिवसांपूर्वी तटकरे यांच्यावर अशाच पद्धतीचे आरोप केले होते.

दापोली येथे कुणबी भवन बांधण्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचे साह्य केले. त्यासाठी शिवसेनेच्या कुणबी नेत्यांना राष्ट्रवादीत येण्याची अट तटकरे यांनी घातली होती. याची कल्पना आल्यानंतर आपण ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांना राष्ट्रवादीत घेण्याचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता तटकरे यांनी ते केल्याचे पाटलांनी उत्तर दिले, अशी माहिती कदम यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

कदम यांनी अनिल परब हे रत्नागिरीतून माझ्याविरोधात कारस्थान करत असल्याचा आरोप केला. त्याला परब यांनी उत्तर देण्याचे टाळले. मी खरा शिवसैनिक असल्याने कदम यांच्या आरोपावर बोलणार नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले. परब यांची लायकी काढताना कदम यांनी त्यांच्यावर बोलणे म्हणजे शिवसेनेवर टीका नसल्याचे स्पष्ट केले. यांनी बेकायदा बांधकामे करायची. आम्ही त्यावर बोललो म्हणजे शिवसेनेवर बोलल्याचे सांगायचे, हे चुकीचे आहे. मला गद्दार म्हटल्याबद्दल माझ्या डोळ्यात पाणी आले. माध्यमांनीही अशा बातम्या देताना विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मला शिवसेनेतून काढले तरी मी शेवटपर्यंत शिवसैनिकच राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपली मुले वेगळा आणि स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील महिनाभरात आपण पत्रकार परिषद बोलवून आगामी निर्णयांची कल्पना त्यात देऊ, असे कदम यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT