Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : इंदिरा गांधींच्या हत्येची आठवण करून देत एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर गंभीर आरोप : 'आपण दोन पंतप्रधान गमावलेत...'

Rahul Gandhi Agitation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका करत ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत गंभीर आरोप केले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 26 July : नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केले होते, त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेला कायदा सांगून राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, नीट पेपरफुटी ही दुर्दैवी घटना असून त्या घटनेचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर फुटीप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी, दहा कोटी रुपये दंड आणि केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अशी तरतूद या नव्या कायद्यात असणार आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणी एनटीएमधून जवळपास २७०० लोकांना काढून टाकण्यात आलं आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि सीबीआय त्या प्रकरणाची चौकशी करत आहे. यातून कोणाचीही सुटका नाही. पेपर फुटीत जो जो सापडेल. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही आपली नैतिक जबाबदारी समजून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राथमिकता दिलेली आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अराजकीय होतं. पण काहींनी ते राजकीय आंदोलन केलं गेलं.

काही लोकं जंतर मंतरवर न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे गेले. पंतप्रधानांचे निवासस्थान हे हाय सेक्युरिटी झोन असतो. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जेव्हा हत्या झाली. तेव्हा एसपीजीचा कायदा करण्यात आला आहे, त्यामुळे पंतप्रधानांच्या निवास स्थानाच्या परिसरात कुठलेही आंदोलन करता येत नाही, ही माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आंदोलन करणं, हजारो लोकांना तिकडं बोलावणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास स्थानामध्ये घातपात घडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा दावा शिंदेंनी केला आहे.

ते म्हणाले, राहुल गांधी नेहमी म्हणतात, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशप्रमाणे देशात अराजकता पसरवणे हा त्यांचा उद्देश होता. हे खऱ्या अर्थाने निषेधार्ह आणि निंदनीय आहे. विरोधी पक्षनेत्याने अशा प्रकारचे कृत्य करता कामा नये. कारण यापूर्वीही आपण देशाचे दोन पंतप्रधान गमावले आहेत. त्यामुळे या घटनेचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सर्वांना इकडं आंदोलनाला या, असं आवाहन करत होते.

आंदोलन तर जंतर मंतरवर होते. पण पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू होता. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. काही लोक त्या ठिकाणी गेले होते, महाराष्ट्रात जनतेने नाकारलेले त्या ठिकाणी पेटवापेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, आता विझू देऊ नका, असे ते बोलत होते. बेगाना शादीमें अब्दुला दिवाना असा त्यांचा विषय आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT