Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
मुंबई

रोहित पवार म्हणाले, हमारा भी टाईम आयेगा...

सरकारनामा ब्युरो

मुंबई - शिवसेनेत फुट पडल्याने राज्यातील राजकारण वेगात बदलले आहे. या वेगात बदललेल्या राजकारणावर एका खासगी वृत्तवाहिनीने आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शिवसेनेतील फुट, राज्य सरकारचे निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, रोहित पवारांचे मंत्रीपद, राज्यातील शिंदे गटाचे सरकार टिकेल का या सह अनेक विषयांवर चर्चा झाली. यात त्यांनी 'हमाराभी टाईम आयेगा' असे सूचक वक्तव्य केले. ( Rohit Pawar said, our time will come... )

एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडण्याची भाषा केली होती. यावर आमदार रोहित पवार म्हणाले की, नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांना मनोबळ द्यावेच लागते. एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. ते निश्चितच कार्यकर्त्यांना मनोबल देतात. खाली समीकरण कसे आहे हे निवडणूक आल्यावरच स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मागील 50 ते 55 वर्षांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात बोलल्या शिवाय महाराष्ट्रात काही राजकारण झाले आहे का? काही झाले तरी शरद पवारांवरच बोलायचे. ट्रक भरून पुरावा घेऊन निघालेल्यांचा ट्रक अजूनही पोचलेला नाही. शरद पवार नुसते हलके हसले, हसले नाहीत, तिकडे पाहिले, वर पाहिले तरी त्याच्या बातम्या होतात. शेवटी शरद पवार यांच्या मनात काय. शेवटी ते एवढे मोठे राजकारणी आहेत की, त्यांनी काही केले, महाराष्ट्रात काहीही घडले तरी ते त्यांच्या मुळेच घडले असेच सर्वांना वाटते.

शिंदे गटाला ठाकरे यांच्या विरोधात बोलून चालणार नाही. शेवटी ही स्टॅटर्जी असू शकते. शिवसैनिक हा नाराज होईल. खापर कोणावर फोडायचे तर नेहमीचेच पवार साहेब आहेतच. शरद पवार व अजित पवारांवर खापर फोडले तर विषय सोपे होतील असे त्यांना वाटत असावे. राज्यातील घटनाक्रमावर अनेकजण तर्कवितर्क लढवतील. मात्र, जे दिसते तेच खरे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नगरसेवक झाल्यासारखं वाटतयं

राष्ट्रवादी भाजपबरोबर जाण्याचा विचार करत होती का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, 2014मध्ये राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. राज्यात स्थिर सरकार असावे हे त्यामागील कारण होते. जे सरकार असावे ते स्थिर असावे. आमच्यापुढे 20-25 वर्षे आहेत. महाराष्ट्र आज टिकला तर पुढे आम्हाला काही तरी करता येईल. विधानसभेत जाताना आमच्या भावना वेगळ्या होत्या. आता विधानसभेत गेल्यावर नगरसेवक असल्यासारखे वाटते. कोणी कुठेही जाते आहे. एकाच टर्ममध्ये दोन सरकार पहावे लागले. आणखी एखादे समीकरण समोर आल्यास आणखी वेगळी स्थिती, असे त्यांनी सांगितले.

अजित दादांचा पहाटेचा शपथविधी

आमच्या सारख्या तरुण आमदारांना 5 वर्षांत जेवढा अनुभव मिळेल. पुढे जाऊन जे राजकारण शिकायचे आहे. तो वेळ आमचा सध्याच्या अनुभवातून वाचेल, असे रोहित पवारांनी सांगताच अजित पवारांच्या पहाटेच्या शपथ विधी संदर्भात विचारण्यात आले. यावर त्यांनी सांगितले की, त्यावेळी मला काय वाटले होते. हे मी लिहिले होते. मला विश्वास बसला नव्हता. त्यावेळी जे झाले ते झाले. त्यानंतर शरद पवारांकडे अजित दादा स्वतः आले. चर्चाही झाली. शेवटी कुटुंब काय आहे हे आम्हाला माहिती आहे. ज्यांना वाटते की पवार कुटुंबात वाद आहेत. त्यांना पवार कुटुंब समजलेच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मला पदाची लालसा नाही

मंत्रीपद मिळाले नाही यावर त्यांनी सांगितले, कर्जत-जामखेडने मला निवडून दिले आहे. कर्जत-जामखेडसाठीच मला पाच वर्षे द्यायची होती. हे माझ्या कुटुंबाने निश्चित केले असावे. मतदार संघात 20 वर्षे काहीच विकास झाला नव्हता. त्यामुळे निधी आणणे आवश्यक होते. मोठा बॅकलॉक मला भरून काढायचा होता. मला पदाची लालसा नाही. मी पद मिळावे म्हणून काम करत नाही. पद हे दिले जाते. कदाचित ते यावेळी मिळणार नव्हते. पद मिळवायची वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी मी मिळवेल. आता सध्या माझ्या डोक्यात मतदारसंघाचा विकास आहे. महाराष्ट्रातून मला फोन येतात. कुणाची काही अडचण असल्यास मी ती सोडवितो. माझे लक्ष केवळ माझा मतदारसंघ आहे. जेव्हा माझी वेळ येईल. ती वेळ मलाच आणावी लागेल. त्यावेळी मी पाहिलं काय करायचे ते. राजकारणात कुठलीही गोष्ट सांगून येत नसते. योग्य वेळ यावी लागते. वेळ आलीय हे कळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. यावर त्यांनी सांगितले की, मलाही असे वाटू लागले आहे. मागील 20 दिवसांत ज्या पद्धतीची ताकद वापरण्यात आली. खासगी विमान वापरण्यात आले. इकडून सुरत. सुरत वरून गुवाहाटी. गुवाहाटीवरून गोवा. त्यात खर्च खूप मोठा होता. हा खर्च कोणी केला हा भाग वेगळाच. मलाही वाटते हे अयोग्य आहे. लोकांनी निवडून दिले तर लोकांसाठी प्रयत्न करावे लागतात. सत्ता नसेल तर विरोधात बसू. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी कष्ट करू. सामान्य लोकांना आमदारकीला. कोणाचा तरी नातू. कोणाचा तरी पुतण्या. म्हणजे पैसा असल्याशिवाय राजकारणात येऊ नये. हा विचार बदलावा लागेल. मला राजकारणात रहायचे असल्याने मला हे बदलायचे आहे. ते केव्हा होऊल हे मला माहिती नाही. मात्र हमाराभी टाईम आयेगा, असे त्यांनी सांगितले.

पार्थ पवारांविषयी

पार्थ पवार यांचे काय चुकले यावर त्यांनी सांगितले, मला आमदारकी लढवायची म्हणून मी स्वतःहून पुढे आलो. त्यांना वाटले ते स्वतःहून पुढे आले. आम्हाला त्या-त्या वेळी संधी देण्यात आली. संधी देणे महत्त्वाचे. पिंपरी चिंचवडच्या सभेला शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा पार्थला विरोध नव्हता. त्यावेळचे वातावरण भाजपच्या बाजूने होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थनाची लाट होती. त्यात पार्थचा पराभव झाला. या लाटेमुळे अनेक चांगले उमेदवार पराभूत झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

माझी स्टाईल वेगळी

तत्कालीन मंत्री राम शिंदेचा पराभव करणे कसे शक्य झाले. असे विचारले असता रोहित पवारांनी सांगितले की, कदाचित माझी स्टाईल वेगळी असेल. ती स्टाईल मतदारसंघातील लोकांना आवडली. माझे राजकारण हे सर्वसामान्य लोकांच्या अवतीभवती अवलंबून असणारे आहे. मी त्यांच्यातीलच एक आहे. मी जे कमविले ते कष्टातून कमविले. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. मी सर्वसामान्य तरूणांसारखाच राहतो. कारण ती माझी स्टाईल आहे. मी लंडनला गेलो तरी हेच कपडे घालतो. अमेरिकेला अजून गेलो नाही मात्र गेलो तरी हेच कपडे घालेल. मतदारसंघातही हेच कपडे घालतो. अनेकांनी सांगितले कुडता पायजामा घालायचा. पांढरे कपडे घालायचे. स्वच्छ प्रतिमा दिसते. मी म्हणालो स्वच्छ प्रतिमा दाखवायला मला पांढरे कपडे घालायची गरज नाही. कारण आजचा युवा असा आहे. मी त्यांचे प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे लोकांना माझी स्टाईल आपलीशी वाटत असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT