Sameer Wankhede with Prakash Ambedkar in Mumbai
Sameer Wankhede with Prakash Ambedkar in Mumbai Sarkarnama
मुंबई

चैत्यभूमीवर तणाव; समीर वानखेडेंना जोरदार विरोध, प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानमित्त एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे सोमवारी सकाळी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर आले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन केले. पण त्याआधी त्यांना काही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंबेडकरांना अभिवादन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

वानखेेडे यांनी चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेत चर्चा केली. दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच ते मुस्लिम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यानंतर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी जात पडताळणी समितीकडून केली जात आहे. यानंतर काही संघटनांकडून वानखेडे यांना जोरदार विरोध होत आहे.

याची प्रचिती सोमवारी चैत्यभूमीवर आली. वानखेडे सकाळी चैत्यभूमीवर पोहचल्यानंतर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने त्यांना जोरदार विरोध केला. घोषणाबाजी करत सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना काही काळ रोखलं. त्यामुळे चैत्यभूमीवर गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी वानखेडे यांच्यासोबतही काहीजण होते.

भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अनिल दगडू कांबळे म्हणाले की, वानखेडे यांना इथे येवून अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. शिकलेल्या लोकांनीच धोका दिल्याचे आंबेडकरांनी म्हटले होते. आंबेडकरांना अभिवादन करायला सर्वांनी यायला हवे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण वानखेडेंना आजच गरज का भासली. एवढे मोठे प्रकरण बाहेर आल्यानंतर अचानक चैत्यभूमीवर येऊन अभिवादन कशासाठी करत आहेत, असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला.

मलिक यांनीही सोमवारी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केले. त्यांनी त्यांनी माध्यमांना वानखेडे यांच्या चैत्यभूमीवर येण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चैत्यभूमीवर कोणत्याही जाती-धर्माचे लोक येऊ शकतात. आंबेडकर हे प्रत्येकाचे आहेत. ते यापूर्वी चैत्यभूमीवर आले होते की नाही, याबाबत मी बोलू शकत नाही. पण ते नमाज पठणाला मी जायचो तिथे येत होते, असे मलिकांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT