Sanjay Raut|
Sanjay Raut|  
मुंबई

उद्धव ठाकरेंच्या सभेत टोमणे की फटके? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut comments on Shivsena rally

मुंबई : "महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. त्यांची मती भ्रष्ट झाल्याने हे सगळं होत आहे. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची हटके आणि फटके सभा आहे. तुम्ही ज्याला टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटके म्हणतो. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला काय माहिती मराठी आणि महाराष्ट्राचा (Maharashtra) इतिहास?” असा सवाल करतच खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

आज (14 मे) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांचा खरपूस समाचार घेणार असल्याचे बोलले जात आहे. याच सभेपुर्वी संजय राऊत यांनीदेखील विरोधकांना इशाराच दिला आहे.

उद्धव ठाकरेंची आजची ही सभा ऐतिहासिक नाही तर क्रांतीकारक ठरणार आहे. कोरोना महामारी, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यांमुळे गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंच्या मोठ्या सभा झाल्या नाहीत. पण आता ते येत आहेत. ही सभेतून उद्धव ठाकरे लोकांच्या, विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणार आहेत. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी राज्याचं वातावरण गढूळ केलं आहे, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी हे पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले केले आहेत. या सगळ्यांना उद्धव ठाकरे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना आपल्या चालीने चालते. त्यामुळे शिवसेनेवर खुलासा करण्याची वेळ येणार नाही. कुणीही सोम्यागोम्या उठतो आणि काही आरोप करतो, तर त्याला उत्तर देण्याची गरज नाही. पण राज्याचं वातावरण गढूळ करून सरकारला काम करूच द्यायचं नाही असं विरोधकांच सुरू आहे. राज्यात महागाई, बेरोजगारीसारखे गंभीर प्रश्न असताना भोंगे, हनुमान चालीसा असे विषय काढले जात आहेत. पण महाराष्ट्रातले विरोधक कधीही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आम्हाला महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त शासन द्यायचं आहे. पण त्याआधी गेल्या ५ वर्षांत फडणवीसांच्या काही सहकाऱ्यांनी जो भ्रष्टाचाराचा चिखल करुन ठेवला आहे तो साफ करायचा आहे. पण आम्ही हात लावायला गेलो, की हे असे मुद्दे काढतात”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण ही मागणी आम्हालाच का करत आहात? महाविकास आघाडीपूर्वी भाजपही पाच वर्षे सत्तेत होती. ही वास्तू तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने हे काम केंद्र सरकारनेच करावे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT