Sanjay Raut PC Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut PC : 'गटारातलं राजकारण' फडणवीस आल्यापासून... ; पवारांना निमंत्रण नसल्याने राऊतांचा तीळपापड!

Chetan Zadpe

Mumbai News : बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमो रोजगार' मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला मिळालं नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Latest News)

"बारामतीत सरकारी महारोजगार मेळावा आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. येथील खासदार सुप्रिया सुळे आहेत. येथे राज्यसभेचे खासदार शरद पवार आहेत. एखाद्या ठिकाणी सरकारी कार्यक्रम होतो, तेव्हा तिकडे स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाते. ही महाराष्ट्राची परंपरा होती. नमो रोजगार हा सरकारी कार्यक्रम आहे. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरातील लग्न नाही. पवारांना निमंत्रण न देणे ही हास्यास्पद गोष्ट आहे," अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले, तुम्ही या. मात्र, या दोघांनी निमंत्रण स्वीकारले नाही, ही माझी माहिती आहे. सकाळीच पवारांशी बोलणे झाले. तुम्ही सरकारी कार्यक्रमाला पवारांना निमंत्रित करत नाही, हा कोणता प्रोटोकॉल आहे? असं राजकारण महाराष्ट्राचं नाही. हा रोजगार मेळावा तुमच्या पिताश्रींचा आहे का? हे अशा प्रकारचं 'डर्टी पॉलिटिक्स' हे देवेंद्र फडणवीस आल्यापासून सुरू झालं. हे गटारातलं राजकारण भाजप आल्यापासून सुरू झालं आहे," अशा शब्दांत संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांचा समाचार घेतला.

बारामतीत 'नमो रोजगार' मेळावा -

उद्यापासून 2 व 3 मार्च रोजी बारामती येथे आयोजित 'नमो महारोजगार मेळाव्या’साठी आत्तापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 300 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची 40 हजारपेक्षा जास्त रिक्त पदे कळविण्यात आली आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

या पदांकरिता 10 वी, 12 वी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार, शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी पात्र उमेदवार यांना संधी असणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT