Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama
मुंबई

कंगना राणावतला दणका! न्यायालयावर अविश्वास दाखवणं पडलं महागात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सध्या वेगवेगळ्या खटल्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरूध्द मानहानीचा खटला दाखल केला आहे. तिने खटला सुरू असलेल्या न्यायालयावर अविश्वास दाखवत दुसऱ्या न्यायालयात खटला वर्ग करण्याची मागणी केली आहे. आता न्यायालयावर अविश्वास दाखवणे कंगनाला महागात पडले आहे.

अंधेरी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयावरील विश्वास उडाल्याचे कंगनाने म्हटले होते. हा खटला दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग करावा, अशी मागणीही तिने केली होती. यासाठी तिने मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला होता. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कंगनाची मागणी फेटाळून लावली होती. याला कंगनाने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत कंगनाला दणका दिला आहे.

कंगनाविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशारा न्यायालयाने नुकताच दिला होता. मुंबईतील अंधेरी येथील महानगर न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी कंगनाच्या वकिलांनी ती देशात नसल्याने सुनावणीला येणार नाही. त्यामुळे उपस्थित राहण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

कंगना एकाही तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची मागणीही भारद्वाज यांनी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश आर. आर. खान यांनी कंगनाला सुनावणीच्या दिवसापुरते हजर न राहण्याची सवलत दिली. पण पुढील तारखेला त्या हजर न झाल्यास जामीनपात्र वॉरंट काढले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यामुळे कंगना अखेर सुनावणीला हजर राहिली होती. दरम्यान, अंधेरीतील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरु केलेल्या अवमान खटल्याच्या कारवाईला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने योग्य प्रकारे हा निर्णय घेतला नाही, असा दावा कंगनाने केला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांनी अंधेरी न्यायालयाची कारवाई योग्य ठरवत कंगनाची याचिका रद्दबातल ठरवली होती.

काय आहे प्रकरण?

कंगनाने अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॅालिवूडमधील सुसाईड गँगमध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले होते. तिच्या या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. कंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु. ती त्याला उत्तर देत नव्हती. या प्रकरणात कंगना सुरवातीला एकदाही न्यायालयात सुनावणीला हजर राहिलेली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT